बहुजन क्रांती मोर्चाची मागणी : संबंधित संघटनेवर बंदी घालण्याचा आग्रह
प्रतिनिधी /बेळगाव
खानापूर येथे अरबाज मुल्ला (वय 24, रा. अजमनगर) या तरुणाचा खून झाला आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. देशातील बहुजन आणि अल्पसंख्याकांच्यावर अन्याय होत चालला आहे. असे प्रकार म्हणजे लोकशाहीला धक्का पोहोचविणाऱया घटना आहेत. अशा घटना घडू नयेत यासाठी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. अरबाजचे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे. याचबरोबर त्या संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी बहुजन क्रांती मोर्चाचे झर्रार पठाण यांनी केली आहे.
विरभद्रनगर येथे पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. अरबाज मुल्ला याला एका संघटनेकडून धमकी येत होती. अरबाज याचे खानापूर येथील तरुणीशी प्रेमसंबंध होते. त्यातून हा खून झाला आहे. प्रेम करणे हा काही गुन्हा नाही. लोकशाहीमध्ये कोणताही जाती-धर्म नाही. तेंव्हा असे खून होणे ही बाब लोकशाहीला मारक आहे, असे सांगत या संघटनेवर कायमची बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणातील आरोपींवर गुन्हे दाखल करून फास्ट्रक्ट न्यायालयात खटला सुरू करून त्यांना शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. देशामध्ये अशा संघटनांमुळे आतंकवाद आणि दहशतवाद वाढल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यावेळी अरबाज मुल्ला याचे नातेवाईक समीर पारिश्वाडी यांनी अरबाज याला आणि त्याच्या आईला जीवे मारण्याची धमकी येत होती. मोबाईलवर ही धमकी दिली गेली. त्यानंतर अरबाज याला बोलावून घेवून त्याचे अपहरण करून त्याचे हात बांधून रेल्वे रुळावर फेकून दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या घटनेमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. अरबाज याने आत्महत्या केली नाही तर हा खूनच आहे. तेंव्हा आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी नवीद कटगी, सलमान मुल्ला, अरीफ कटगेरी, आयुब जकाती, गोपी बळ्ळारी, अन्वर अली नदाफ, अश्फाक मडकी यांनीही या घटनेचा निषेध करून आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली आहे.
खून करणाऱयांवर कठोर कारवाई करा
महिलांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
बेळगाव ः खानापूर येथील तरुणाचा खून करणाऱया संशयित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी महिलांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. अरबाज मुल्ला या तरुणाचा खून करण्यात आला आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबांवर मोठा आघात झाला आहे. तेंव्हा त्यांना न्याय द्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे.
प्रेम प्रकरणांतून या तरुणाचा खून झाला, असे सांगितले जात आहे. मात्र यामध्ये काही संघटनांचा सहभाग असून त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. खानापूरमधील ही घटना गंभीर आहे. एकमेकांवर आरोप केले जात आहेत. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सीमा इनामदार यांच्यासह महिला उपस्थित होत्या.