ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनामुळे ओढावलेले आर्थिक संकट लक्षात घेऊन पुढील पाच वर्षासाठी महाराष्ट्राला दरमहा दहा हजार कोटींचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी अर्थमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात अजित पवार म्हणतात की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉक डाऊन सुरू आहे. त्यामुळे राज्याच्या उत्पन्नात घट झाली आहे आणि राज्यावर खर्चाचा भार मात्र वाढला आहे. त्यामुळे याचा मेळ साधण्यासाठी पुढील पाच वर्षासाठी महाराष्ट्राला दरमहा पाच कोटींचे अनुदान द्यावे तसेच आर्थिक आव्हानाचा सामना करण्यासाठी वित्तीय तुटीची मर्यादा पाच टक्क्यांपर्यंत वाढवण्यात यावी अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
तसेच सुरु असलेल्या टाळेबंदीमुळे मार्च महिन्यात महाराष्ट्राच्या जीएसटी उत्पन्नात 27 कोटींची घट झाली आहे. टाळेबंदी अशीच सुरू राहिली तर पुढचे काही महिने अर्थव्यवस्था खाली जाण्याची भीती आहे.
त्याचबरोबर केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला देय निधी मिळत नसल्याने ह्या जबाबदाऱ्या पार पाडणे अवघड झाले आहे , त्यामुळे केंद्राने महाराष्ट्र सरकारला तात्काळ मदत द्यावी अशी मागणी पवार यांनी केली आहे.