भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष तानावडे यांचा दावा
प्रतिनिधी /पणजी
केंद्रीय अर्थसंकल्पाचा मोठा लाभ गोव्याला होणार, असा दावा भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केला असून शेतकरी वर्गालाही फायदा होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पणजीत घेतलेल्या अर्थसंकल्पावरील पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे कौतुक केले. उपाध्यक्ष दिलीप परुळेकरही यावेळी उपस्थित होते.
तानावडे म्हणाले की, अर्थसंकल्पातील अनेक तरतुदींचा गोव्यालाही फायदा होईल. संरक्षण खात्यातील तरतुदींमुळे गोवा शिपयार्डला उपयोग होईल. तसेच गोवा अँटिबायोटिक्स या कंपनीला ऊर्जितावस्था प्राप्त होईल. तसेच राज्यातील शेतकऱयांना कृषी खात्यासाठी केलेल्या तरतुदींचा फायदा करून घेता येईल. राज्यातील पर्यटनासह व्यापार उद्योग वाढीस लागून रोजगार निर्मिती होईल. यामध्ये केवळ गोमंतकीयांना प्राधान्य दिले जाईल. हा अर्थसंकल्प देशाचा विकासदर वाढविणारा असून मोठी रोजगार निर्मिती त्यातून होणार आहे. शैक्षणिक क्षेत्रासाठी त्यात मोठी तरतूद करण्यात आली असून आयात शुल्कात कपात केल्यामुळे इंधन दर कमी होतील, असे त्यांनी नमूद केले.
सर्व घटकांना न्याय दिला
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दि. 1 रोजी अर्थसंकल्प मांडला. दि. 2 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्प साध्या आणि सोप्या भाषेत समजावून सांगितला. अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांना न्याय दिला आहे. देशाचा विकास दर 9.27 टक्के राहील, अशा तरतुदी यात करण्यात आल्या आहेत. भाजपा सरकारने आगामी पाच वर्षांत साठ लाख नव्या रोजगाराची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट या अर्थसंकल्पात ठेवले आहे. आत्मनिर्भर भारत संकल्पनेस चालना देण्यासाठी संरक्षण खात्याच्या एकूण खर्चापैकी सुमारे 68 टक्के रक्कम देशांतर्गत उद्योगांना देऊन संरक्षण साहित्याची निर्मिती करण्यात येणार असल्याचे यावेळी शेट तानावडे यांनी सांगितले.
देशभरात 80 लाख घरे उभारणार
अर्थमंत्र्यांनी देशातील उद्योगांना उभारी देण्यासाठी कॉर्पोरेट टॅक्स 18 वरून 15 टक्क्मयांवर आणला आहे. तसेच त्यावरील सरचार्ज 12 वरून 7 टक्क्मयांवर आणला आहे. आयकर परतावा विवरणपत्र भरताना काही चूक राहिल्यास त्या सुधारण्यासाठी पुन्हा संधी मिळेल. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देशात सुमारे 80 लाख घरे बांधण्यात येतील. यासाठी तब्बल 48 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षणासाठी 100 टिव्ही वाहिन्या
पंतप्रधान गती शक्ती योजनेंतर्गत राष्ट्रीय महामार्गाचे जाळे वाढवले जाणार असून त्यासाठी 20 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आगामी तीन वर्षात देशात सुमारे 400 नवीन वंदे मातरम् रेल्वे सुरू होतील. तर 400 नवीन बुलेट टेन सुरु होतील. याचचाबरोबर सर्व भाषांमध्ये 100 टिव्ही वाहिन्या सुरू करून शालेय शिक्षण दिले जाणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहेत.