बेंगळूर/ वृत्तसंस्था
येत्या जुलै महिन्यात येथे होणारी भारतातील पहिली अल्ट्रा रनिंग चॅम्पियनशिप स्पर्धा कोरोना व्हायरस महामारीमुळे लांबणीवर टाण्याचा निर्णय स्पर्धा आयोजकांनी शुक्रवारी घेतला आहे.
भारतामध्ये पहिल्यांदाच अल्ट्रा रनिंग चॅम्पियनशिप स्पर्धा बेंगळूर येथे 18 आणि 19 जुलै रोजी आयोजित केली होती. सदर अल्ट्रा रनिंग चॅम्पियनशिप स्पर्धा ही नेहमीच्या पारंपरिक फुल मॅरेथॉनच्या तुलनेत अधिक कालावधीची असून यामध्ये धावपटूंसमोर मोठे आव्हान राहते. अल्ट्रा रनिंग स्पर्धा ही किमान 50 कि.मी. पल्याची असते. सदर स्पर्धा 100 किंवा त्याहून अधिक पल्याची आयोजित केली जाते. ही स्पर्धा दोन दिवसांच्या कालावधीत घेतली जाते. धावपटूसाठी सहा तास 24 तासांचा कालावधी निश्चित केला जातो. भारतामध्ये अशा तऱहेची स्पर्धा आंतरष्ट्रीय अल्ट्रा रनर्स संघटनेतर्फे आयोजित केली होती. पण देशातील कोरोना व्हायरसची परिस्थिती बिकट होत असल्याने ही स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घोषित केला आहे. 2021 साली बेंगळूरमध्ये 100 कि. मी. पल्ल्याची आशियाई आणि ओसेनिया अल्ट्रा रनिंग स्पर्धा भरविली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय अल्ट्रा रनर्स संघटनेचे 2017 साली अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशन सदस्य झाले आहे.