वार्ताहर/ झुआरीनगर
कासावलीतील विविध भागात भातशेती कापणीला प्रारंभ झालेला आहे. परंतु सध्या अवकाळी पडत असलेल्या पावसामुळे भात सुकवण्याची चिंता शेतकऱयांना सतावत आहे. मुरगाव तालुक्यातील कासावलीतच थोडय़ा फार प्रमाणात शेती शिल्लक आहे. येथील आरोसी कुयेली भागात शेती केली जाते.
शेतकऱयांनी विविध समस्यावर मात करून अजूनही हा पारंपरिक व्यवसाय जीवंत ठेवलेला आहे. येथील आरोसी कुयेली भागातील काही शेतकऱयांनी भातशेतीची कापणी केलेली आहे. परंतु सध्या पडत असलेल्या पावसामुळे भात सुकवण्याची समस्या निर्माण झालेली आहे. भाताला पाणी लागू नये यासाठी भात भरून ठेवलेल्या पिशव्यांवर प्लास्टिक आवरणे बांधून ठेवलेली आहेत. पाऊस गेल्य़ावर भात सुकवण्यासाठी जेव्हा पसरवले जाते तेव्हा लगेच पाऊस येतो व शेतकऱयांना पुन्हा हे सर्व भात एकत्र करून त्यावर प्लास्टिक आवरण घालावे लागते. वारंवार ही कामे करत असताना शेतकऱयांची पूर्ण दमछाक होते. उन्हाच्या प्रतिक्षेत हे शेतकरी दिवसभर या जागेत थांबतात तसेच ओले असलेले भात असेच पिशवीत भरून ठेवले तर ते अंकुरीत होण्याची भीतीही शेतकऱयांना सतावत आहे. गेले काही दिवस पडत असलेल्या या पावसामुळे काही शेतकऱयांनी अजून कापणी केलेली नाही. परंतु पावसामुळे शेती चिखलाला लागून नासाडी होण्याची समस्याही शेतकऱयांना सतावत आहे. अवकाळी पावसामुळे येथील शेतकरी वर्ग हवालदील झालेला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून कबाड कष्ट करून उगवलेली ही शेती नष्ट होण्याची भीती शेतकऱयांकडून व्यक्त होत आहे. पाऊस असाच चालू राहिल्यास येथील शेतकऱयांना बरेच नुसकास सहन करावे लागणार आहे.