नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्ली कॅपिटल्सचा स्पीडस्टार अवेश खानला बीसीसीआयने टी-20 वर्ल्डकपसाठी युएईमध्येच थांबण्याची सूचना केली आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा संपन्न झाल्यानंतर अवेश नेट बॉलर म्हणून भारतीय पथकात दाखल होईल, असे मंडळाने यावेळी स्पष्ट केले. 24 वर्षीय अवेश खान हा नेट बॉलर म्हणून संघासमवेत थांबण्याची सूचना करण्यात आलेला दुसरा गोलंदाज आहे. यापूर्वी काश्मिरी जलद गोलंदाज उमरान मलिक हा राखीव फळीतील पहिला खेळाडू ठरला होता. भारतीय संघ यंदा आपल्या विश्वचषक मोहिमेला दि. 24 ऑक्टोबर रोजी प्रारंभ करेल.
‘सध्या अवेश खानला नेट बॉलर म्हणून समाविष्ट केले आहे. पण, संघव्यवस्थापनाला आवश्यकता वाटली तर त्याला आणखी बढती मिळू शकते’, असे निवड समितीशी संलग्न असलेल्या बीसीसीआयमधील एका सूत्राने नमूद केले. यंदा आयपीएल हंगामात सर्वाधिक बळी घेणाऱया गोलंदाजांच्या यादीत अवेश खान हर्षल पटेलपाठोपाठ दुसऱया स्थानी विराजमान आहे. अवेशचा यापूर्वी इंग्लंड दौऱयात राखीव खेळाडू म्हणून समावेश होता. मात्र, बोटाच्या दुखापतीमुळे त्याला तो दौऱया अर्ध्यावर सोडून द्यावा लागला होता.