कोरोना संसर्गामुळे निर्णय विशेष व्यवस्था होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय विमानसेवांवरील बंदी 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, काही देशांबरोबर केलेल्या ‘विशेष व्यवस्थे’मुळे (ट्रव्हल बबल्स) त्या देशांमधून आलेल्या किंवा तेथे जाणाऱया प्रवासी विमानांना अनुमती देण्यात येणार येईल. सध्या अशी व्यवस्था अमेरिका, जर्मनी, आणि फ्रान्स या देशांसमवेत करण्यात आली आहे. आगामी काळात ती ब्रिटन व कॅनडा अशा आणखी काही देशांबरोबरही करण्यात येईल, असे स्पष्ट केले गेले.
आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर 22 मार्चपासून बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अनेक देशांमधील भारत्तीयांना परत आणण्यासाठी योजना क्रियान्वित करण्यात आली. हे भारतीय या देशांमध्ये पर्यटनासाठी गेले होते. तसेच अनेकजण व्यवसाय किंवा शिक्षणाच्या निमित्ताने तेथे होते. अशा हजारो भारतीयांना आतापर्यंत परत आणण्यात आले आहे. ही प्रक्रिया यापुढेही सुरू राहणार आहे.
देशांतर्गत विमान प्रवासावर पूर्ण बंदी असल्याने गेल्या दोन महिन्यांमध्ये विमान प्रवासाचे प्रमाण जवळपास शून्यावर आले होते. आता देशांतर्गत विमानसेवा हळू हळू सुधारत आहे. मात्र अद्याप केवळ 30 टक्केच सुधारणा झाली आहे. देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या 50 टक्क्यांपर्यंत पोहचल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासंबंधी विचार केला जाऊ शकतो, अशी माहिती प्रवासी विमान वाहतूक मंत्री एच. एस. पुरी यांनी पत्रकारांना निवेदनाद्वारे दिली.
काही विमानतळांवर सेवा सुरू
मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर गेल्या आठवडय़ात 21 विमाने उतरली. ती अमेरिका, फ्रान्स आणि जर्मतीहून होती. त्यातून 3 हजार 59 प्रवासी भारतात आले. यापैकी 1 हजार 185 अमेरिकहून आले. तर फ्रान्सहून 660 आणि जर्मनीतून 1 हजार 214 प्रवासी आले, अशीही माहिती देण्यात आली.