कृषी कायद्यांविरोधातील धार सहा महिन्यांनंतरही कायम
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात नव्याने लागू करण्यात अलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असणाऱया आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाल्यानिमित्त शेतकरी आंदोलकांसह देशातील विविध संघटनांनी बुधवारी काळा दिवस पाळला. यावेळी आंदोलनस्थळाबरोबरच पंजाब, हरियाणात अनेक गावांमध्ये आंदोलन करण्यात आले.
दिल्लीच्या टिकरी, सिंघू आणि गाझीपूर सीमांवर पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी 26 नोव्हेंबरपासून निदर्शने करत आहेत. केंद्र सरकारने त्यांच्याशी सुरू असणारी चर्चा 22 जानेवारीपासून थांबवली आहे. मात्र, शेतकरी आंदोलक मागण्यांवर ठाम असून त्यांचे आंदोलन सुरूच आहे. शेतकऱयांनी या आंदोलनात समाजातील अन्य घटकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. बुधवारच्या आंदोलनादरम्यान पंजाबमधील बहुतांश गावांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमांचे दहन करण्यात आले. नव्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आपण आजचा काळा दिवस पाळत असल्याचे आंदोलकांनी यावेळी स्पष्ट केले.
लुधियाना जिह्यातील शिदवान कलान येथे महिला आंदोलकही मोठय़ा प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. ‘आम्ही लढू; आम्ही जिंकू’ अशा घोषणा आंदोलकांकडून दिल्या जात होत्यात. अमृतसर जिह्यातही शेतकऱयांनी काळे झेंडे घेऊन मोर्चा काढला. अन्य राज्यांमध्येही आंदोलन करण्यात आले. मात्र, कोरोनाविषयक निर्बंधांमुळे मर्यादित लोक आंदोलनात सहभागी झाले होते. अनेक विरोधी पक्षांनी शेतकऱयांच्या या ‘काळा दिन’ला पाठिंबा दिला आहे. शेतकरी आंदोलकांच्या मागण्यांवर सर्वमान्य तोडगा काढण्याची विनंती करणारे पत्र विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी पंतप्रधानांना पाठवले आहे.