कृष्णा नदीच्या जलवाटपावरून पेटला वाद
वृत्तसंस्था / हैदराबाद
कृष्णा नदीवरील वादग्रस्त प्रकल्पावरून तेलंगणा आणि आंध्रप्रदेशादरम्यान पाण्याचा वाद दोन तेलगूभाषिक राज्यांच्या नेत्यांच्या विधानांमुळे तापला आहे. कृष्णा नदीच्या जलवाटपावरून आंतरराज्य वाद पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे. रायलसीमा लिफ्ट सिंचन प्रकल्पाच्या (आरएलआयपी) निर्मितीच्या दिशेने आंध्रप्रदेश पावले टाकत आहे. राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश रोखण्यासाठी आंधप्रदेश सरकार प्रयत्नशील आहे.
तेलंगणाच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करत आंध्रप्रदेश सरकारने कथितरित्या कोरोनाच्या दुसऱया लाटेदरम्यान आरएलआयपीशी संबंधित कामे पूर्ण केली आहेत. रायलसीमा लिफ्ट सिंचन प्रकल्प आमच्या हितसंबंधांना फटका पोहोचविणार असल्याचे तेलंगणाचे म्हणणे आहे. तर जलवाटप कराराच्या अंतर्गत उपलब्ध पाण्यापेक्षा अधिक पाण्याचा वापर करत नसल्याची आंध्रची भूमिका आहे.
आंध्रप्रदेशने पाणी वळविल्यास आमच्या 5 जिल्हय़ांमध्ये समस्या निर्माण होणार असल्याचे तेलंगणाचे ऊर्जामंत्री जगदीश रेड्डी यांनी म्हटले आहे. जलवाटपाचा हा वाद तेलंगणाच्या स्थापनेपूर्वी पासूनचा आहे. संयुक्त आंध्रप्रदेशमध्ये तेलंगणा क्षेत्रातील नेत्यांनी सातत्याने सरकारांकडून नद्यांचे पाणीवाटप आणि सिंचन प्रकल्पांच्या निर्मितीमध्ये क्षेत्रासोबत अन्याय होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या.
2014 मध्ये स्वतंत्र राज्य
जलसंपदा, निधी आणि नोकऱयांमधील अन्याय याच मुद्दय़ांवरून तेलंगणा राष्ट्र समितीने या क्षेत्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यासाठी आंदोलन केले होते. 2014 मध्ये तेलंगणाला राज्याचा दर्जा मिळाल्यावर जलवाटपावरून वाद अधिकच वाढला आहे. कारण आंध्रप्रदेशवर अधिक पाणी खेचण्याचा आरोप होत आहे.
तेलंगणाच्या हितासाठी लढा
राज्याच्या हितासाठी लढत असल्याचा दावा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारने केला आहे. तेलंगणाचे नेते जलवादावर प्रक्षोभक विधाने करत आहेत. या कृत्यांमुळे आंध्र तसेच तेलंगणालाही लाभ होणार नाही. भावना भडकविण्याचा आमचा हेतू नसल्याचा दावा आंध्रप्रदेशचे मंत्री पर्नी नानी यांनी केला आहे.
करारानुसारच निर्णय
आंध्रप्रदेशला मिळालेल्या कोटय़ापेक्षा एक थेंबही अधिक घेत नाही आहोत. आम्ही केंद्र आणि शेजारी राज्यांसोबत सौहार्दपूर्ण संबंध इच्छितो. वायएसआर यांनी तेलंगणासाठी काय केले हे प्रत्येक जण जाणतो. तेलंगणात काही नेते राजकीय लाभासाठी वायएसआर यांच्यावर टीका करत असल्याचे आंध्रच्या मंत्र्याने म्हटले आहे.