आमदार नीतेश राणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी
वार्ताहर / कणकवली:
देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्याने कोकणातील आंबा मार्केटमध्ये पोहोचण्यास उशीर झाला. तसेच इतर देशातही आंबा निर्यात होणार नाही. आंबा बागायतदारांसाठी हा सर्वात कठीण काळ आहे. त्यामुळे आंबा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. आंबा उत्पादक शेतकऱयांना 50 टक्के अनुदान जाहीर करण्याची मागणी आमदार नीतेश राणे यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राणे यांनी म्हटले आहे, कोरोनामुळे आंबा बागायतदार, मत्स्य व्यवसाय अडचणीत सापडला आहे. राज्य शासनाकडून 32 कोटीच्या डिझेल परताव्याची घोषणा झाली. मात्र, सहाय्यक आयुक्तांच्या दिरंगाईमुळे हा निधी मच्छीमारांपर्यंत पोहोचला नाही, याकडे राणे यांनी मत्स्योद्योगमंत्री अस्लम शेख यांचे लक्ष वेधले आहे. राज्यात अन्य कारणांसाठी डिझेल परताव्याचा निधी वापरण्यात येत असल्याचे समजते. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गातील मच्छीमारांना अगोदरच रखडलेलाही डिझेल परतावा मिळणार नाही. पहिल्या टप्प्यात मिळालेल्या 32 कोटीनंतर वित्त विभागाकडून डिझेल परताव्याचे 40 कोटी येणे होते. मात्र, आता जमा असलेल्या 32 कोटी पैकी मुंबई शहर व उपनगर वगळता उर्वरित पाच जिल्हय़ांचे पैसे इतर कारणांसाठी वापरले जाणार असतील, तर गरीब मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. यामुळे मच्छीमारांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. कोरोनामुळे राज्यातील रिक्षा चालक व मालकांचे मोठे नुकसान झाल्याने या रिक्षा चालक, मालकांना अर्थसहाय्य व इन्शुरन्समध्ये 50 टक्के सवलत देण्यात यावी.