आंबेवाडी ग्राम पंचायतीला विद्यार्थी संघटनेचे निवेदन
वार्ताहर / हिंडलगा
आंबेवाडी गावाला राज्य परिवहन मंडळाकडून होणाऱया दैनंदिन बससेवेचे वेळापत्रक कोलडमले आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना जाणाऱया विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल होत असून त्वरित बससेवा सुरळीत करून विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय दूर करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी निवेदन देण्यात आले.
ग्राम पंचायतीला दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, आंबेवाडी गावातून बेळगाव शहरातील शाळा व महाविद्यालयाला जाणाऱया विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. सर्व विद्यार्थ्यांनी बसने प्रवास करण्यासाठी वर्षाकाठी परिवहन मंडळाचे शुल्क भरून पास काढला आहे. पण सध्या गावाला सोडण्यात येणारी आंबेवाडी व मण्णूर बसचे वेळापत्रक पूर्णतः कोलडमले आहे. परिणामी सकाळच्या वेळी विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयांना वेळेत पोहोचणे मुश्कील बनले आहे. शिवाय वेळेत बस नसल्याने पुन्हा पैसे भरून विद्यार्थ्यांना खासगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पास काढून देखील विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवास करण्यासाठी पैसे मोजावे लागत असल्याने दैनंदिन आर्थिक भुर्दंड बसत आहे. तसेच शाळेला वेळेत पोहचत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे त्वरित लक्ष देऊन बससेवा सुरळीत करावी. आणि विद्यार्थी व प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगी ग्रा. पं. अध्यक्ष चेतन पाटील यांनी निवेदन स्वीकारून लवकरच बसची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी ग्रा. पं. उपाध्यक्षा सरिता नाईक, सदस्य पुंडलिक भांदुर्गे, अर्जुन राक्षे, नारायण लोहार, लक्ष्मी यळगूकर, सुवर्णा लोहार, आरती न्हावी, सुभाष नाईक, संगीता अंबेकर यांच्यासह कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.