प्रतिनिधी/ वास्को
आगशी, कुठ्ठाळी, सांकवाळ या भागात वाहतूक कोंडीची समस्या पुन्हा उग्र बनू लागलेली आहे. शनिवारी दुपारी या महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे या मार्गावरील प्रवासी त्रस्त बनले. संध्याकाळपर्यंत ही समस्या होती.
मागच्या दोन वर्षांपासून कुठ्ठाळी नाका तसेच आगशी, सांकवाळ तसेच वेर्णापर्यंत वाहतूक कोंडी होत असते. ही समस्या हल्ली जरा हलकी झाली होती. मात्र, अधूनमधून वाहन चालकांना व प्रवासी वर्गाला वाहतुक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. काल शनिवारी दुपारीही या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. या मार्गावर दोन किरकोळ अपघात झाल्याचे निमित्त या वाहतूक कोंडीमागे होते. कुठ्ठाळी नाका व झुआरी पूल पार करण्यातच वाहन चालकांना तासाभराचा वेळ खर्ची घालावा लागला. संध्याकाळपर्यंत ही समस्या हळूहळू कमी झाली.
शुक्रवार, शनिवार व रविवार असे सलग सुट्टीचे दिवस आल्याने वाहनांच्या वर्दळीत वाढ झालेली आहे. तसेच ख्रिसमस आणि नवनवर्षानिमित्त गोव्यात पर्यंटकांची संख्याही वाढू लागलेली आहे. त्यामुळे कुठ्ठाळी, आगशी या भागात वाहतूक कोंडीची समस्या वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.