प्रतिनिधी/ पणजी
आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष लढवणार असून त्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केले. खाणप्रश्नी सरकारचे व पक्षाचे प्रयत्न चालू असून म्हादई प्रश्नावर कोणतीच तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच आपण स्वतः निवडणूक लढविणार नसल्याचे संकेतही दिले. येती जिल्हा पंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर लढविण्याच्या निर्णयावर पक्ष ठाम असल्याचे ते म्हणाले.
तानावडे यांनी दि. 22 रोजी तरुण भारतच्या पणजी कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी संवाद साधताना बोलत होते. त्यांच्यासोबत संदेश साधले यांचीही उपस्थिती होती.
तानावडे पुढे म्हणाले की, आपण पक्षाचा कार्यकर्ता असून आमदारकीची उमेदवारी दिली नाही म्हणून कधी नाराज झालो नाही व पक्ष सोडण्याचा कधी विचार केला नाही. नेहमी सकारात्मक पद्धतीने काम करीत राहिलो. तेव्हा वेगळी वाट धरली असती तर आज अध्यक्षपदापर्यंत पोहोचलो नसतो. ते पद आमदारकीपेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे.
प्रथम पंच, नंतर सरपंच व पुढे भाजपमध्ये विविध पदे सांभाळली याचा तानावडे यांनी थोडक्यात आढावा मांडला. कार्यकर्ते-मतदार आणि आमदार यांचा सातत्याने संपर्क राहावा म्हणून कार्यरत राहाणार असून आपणास पक्षाने मोठे केले. आता पक्षाध्यक्षाची नवी जबाबदारी यशस्वीपणे पेलणार अशी खात्री त्यांनी दिली.
जिल्हा पंचायत निवडणूक पक्षीय पातळीवरच
जिल्हा पंचायत निवडणुका म्हणजे विधानसभेची सेमी फायनल नव्हे, असे स्पष्ट मत त्यांनी प्रकट केले. दोन्ही निवडणुकीतील विषय वेगवेगळे असतात. त्यांची तुलना करणे योग्य नाही. पक्षीय पातळीवर जिल्हा पंचायत निवडणूक घेण्यास काही प्रमाणात विरोध असला तरी त्या निर्णयापासून पक्ष आता ढळणार नाही. निवडणूक पक्ष पातळीवर घेतली नाही तर अनेक उमेदवार निवडणुकीत उतरतात. म्हणून ज्यांना चिन्ह मिळते तोच अधिकृत उमेदवार ठरतो म्हणून ती पक्ष पातळीवर घेण्याचे सरकारने ठरवल्याची माहिती त्यांनी दिली.
आर्थिक स्थितीबाबत मुख्यमंत्रीच बोलू शकतात
राज्याची आर्थिक स्थिती नियंत्रणात आहे आणि त्याबाबत मुख्यमंत्रीच अधिक बोलू शकतात असे सांगून तानावडे म्हणाले की, 100 टक्के सर्वांना सरकारी नोकऱया देणे शक्य नाही. तरीपण खासगी उद्योग, कंपन्या, कारखाने आणून तेथे बेकारांना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न केले जातील. काही वेळा काही प्रश्नावर जनतेमध्ये नाराजी निर्माण होते ती दूर करण्याचे काम कार्यकर्ते करतात व तेच मतदारांसाठी मते मिळवून देण्यासाठी राबतात म्हणून त्यांना सक्षम करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.