सध्या गोव्यात अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने तसेच भविष्यातही धोका कायम असल्याने विद्यापीठाच्या परीक्षा होतील की नाही, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोविड-19च्या पार्श्वभूमीवर गोव्यात सध्या दहावीच्या परीक्षेवरून गोंधळाची स्थिती होती. प्रकरण कोर्टात पोहोचले आहे. दहावीची परीक्षा रद्द करावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली तर भाजप सरकार ही परीक्षा होईल व त्याची संपूर्ण तयारी झाल्याचे सांगत आहे, मात्र केवळ दहावीचीच परीक्षा नव्हे तर आगामी शैक्षणिक वर्षच अंधुक बनले आहे.
दहावीची परीक्षा आजपासून सुरू होते आहे. ही परीक्षा पूर्ण होईपर्यंत मे महिना संपलेला असेल. साहजिक निकालास विलंब लागेल. त्याचा परिणाम शैक्षणिक वर्षावर नक्कीच होणार आहे. गोवा विद्यापीठाने प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल जाहीर करण्याचा आदेश सर्व महाविद्यालयांना दिला आहे तर अंतिम वर्षाच्या परीक्षा लांबवणीवर टाकलेल्या आहेत. सध्या गोव्यात अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने तसेच भविष्यातही धोका कायम असल्याने विद्यापीठाच्या परीक्षा होतील की नाही, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोरोनावर अद्याप औषध निघालेले नाही. त्यामुळे कोरोना लवकर नियंत्रणात येण्याची शक्यता कमीच आहे. सध्या गोव्यात सापडलेले कोरोना रुग्ण हे इतर राज्यांतून आल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व रुग्ण वैद्यकीय उपचारानंतर ठीक होऊन घरी जातील पण उद्या समजा त्यांना पुन्हा कोरोनाची बाधा झाली तर काय होईल, याचा विचार होणेही तेवढेच गरजेचे आहे. कारण चीन व इतर देशांमध्ये इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाने ग्रासले आहे.
आज गोव्यातील लोकांना कोरोनाची बाधा झालेली नाही, असे सरकारतर्फे सांगितले जात आहे पण शेजारील महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यात झपाटय़ाने वाढ होते आहे. त्यामुळे गोव्याला धोका नाही, असा दावा या क्षणी करणे अतिशयोक्तीचे ठरू शकते. आज कोरोनासहीत जीवन जगायला शिकले पाहिजे, असे सर्वजण सांगू लागले आहेत. एका अर्थी ते बरोबरही आहे. कारण कोरोना रोखणे शक्य नसल्याचे सर्वांनाच पटले आहे. आपण कॅन्सर, मलेरिया, डेंग्यू यासारखे आजार-रोग घेऊन फिरतो आहोतच. त्याचप्रमाणे कोरोनासहित जीवन जगण्याची तयारी आता सर्वांनाच करावी लागणार आहे. लॉकडाऊन किती काळपर्यंत ठेवणे शक्य आहे, लॉकडाऊनमुळे प्रत्येक राज्याची आर्थिक घडी विस्कटू लागली आहे. अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱयांना कामावरून कमी करण्यावर भर दिला आहे. तसेच मासिक वेतनालाही कात्री लावली आहे. यातून सावरायचे कसे, याचा प्रत्येकजण विचार करू लागला आहे.
गोव्यात शैक्षणिक वर्षाला जून महिन्यात प्रारंभ होतो मात्र यंदा शैक्षणिक वर्ष लांबणीवर पडणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांनी आपल्या शिक्षकांना ऑनलाईन वर्ग घ्यावे लागणार असल्याची कल्पना दिली असून त्या दृष्टिकोनातून तयारी करण्यास सांगितले आहे. शिक्षण खात्याने तर पाच हजार शिक्षकांसाठी ऑनलाईन वर्गांचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांना ऑनलाईन वर्गांचे प्रशिक्षण दिले जात आहे. ज्यामुळे शिक्षकही स्वतः आपल्यात सुधारणा घडवून आणतील, असा दावा केला जात आहे.
सध्या देशभरातील सर्व महाविद्यालये कोविड-19 मुळे बंदच आहे. त्यात वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग घेतले जात आहे. असे वर्ग घेऊन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. उद्या कोरोना नियंत्रणात आला नाही व त्याचा प्रभाव कायम राहिला तर कुणीही पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याचे धाडस करणार नाही. पहिले ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वर्षाचा प्रश्न सध्या ऐरवणीवर आला आहे. ऑगस्ट-सप्टेंबर पर्यंत शैक्षणिक वर्ष लांबणीवर पडण्याची शक्यता शिक्षणतज्ञ व्यक्त करतात. अशावेळी ऑनलाईन वर्गाशिवाय पर्याय नाही. यंदा शालेय व हायस्कूल पातळीवर ऑनलाईन वर्ग घेण्याची तयारी सुरू झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याजवळ आता स्मार्ट फोन असणे गरजेचे बनले आहे. नाही म्हटले तरी प्रत्येकाच्या घरी एक तरी स्मार्ट फोन आहेच. ज्यांच्याकडे नसेल त्यांना स्मार्ट फोन खरेदी करावा लागेल. हा अतिरिक्त खर्चाचा बोजा पालकांवर पडणार आहे.
ऑनलाईन वर्गासाठी विद्यार्थ्यांना एक ‘ऍप’ डाऊनलोड करावा लागेल. त्या ऍपद्वारे शिक्षक विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधू शकतील पण या ठिकाणी एक मोठा धोका आहे, तो म्हणजे मोबाईलची रेंज (नेटवर्क) मिळण्याचा. गोव्यात आजही मोबाईलचे नेटवर्क ही एक मोठी समस्या बनून राहिली आहे. शहरी भागातच ‘रेंज’ची समस्या आहे तर ग्रामीण भागाची परिस्थिती त्याहून अधिक वाईट आहे. या अडथळय़ावर मात केली तरच ऑनलाईन वर्गाची संकल्पना पुढे जाईल, अन्यथा समस्येत आणखीन भर पडणार आहे.
ऑनलाईन वर्ग घेतले तरी आपली मुले सातत्याने त्यात लक्ष केंद्रीत करतात की नाही, हे पाहण्याची जबाबदारी पुन्हा एकदा पालकांवरच येणार आहे. ऑनलाईन वर्गावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पालकांनीच मुलांना प्रोत्साहन द्यावे लागेल. पूर्वी मुले शाळेत-हायस्कूलमध्ये गेली की, त्यांची जबाबदारी शिक्षकांवर असायची. मात्र आता शिक्षकांबरोबरच पालकांनाही तेवढीच महत्त्वाची भूमिका वठवावी लागणार आहे. गाफिल राहिलात तर शैक्षणिक वर्षाचा बट्टय़ाबोळ होण्यास विलंब लागणार नाही. त्यामुळेच आगामी शैक्षिणक वर्ष हे सर्वांसाठीच कसोटीचे ठरणार आहे.
महेश कोनेकर