प्रतिनिधी / आचरा:
गेल्या चार दिवसांपासून आचरा पारवाडी भागात पुन्हा एकदा बिबटय़ाचा वावर वाढला असून येथील ग्रामस्थांच्या पडवीतील कोंबडय़ांना बिबटय़ाने लक्ष्य केले आहे. दिवसाही या भागात बिबटय़ा ग्रामस्थांच्या नजरेस पडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत वन विभागाने तातडीने बिबटय़ाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. आचरा पारवाडी भागात गुरुवारपासून पुन्हा एकदा बिबटय़ाचा वावर वाढला आहे. गुरुवारी सायंकाळी पारवाडी येथील सावंत कुटुंबाच्या पडवीतील कोंबडय़ा बिबटय़ाने पळवल्या. बिबटय़ा फिरत असल्याचे लक्षात येताच सावंत यांनी अंगणात बांधलेली गुरे सुरक्षित जागेत हलविल्याने बिबटय़ाच्या तावडीतून ती सुटली. याबाबत पारवाडी ग्रामस्थांनी वन विभागाला कल्पना दिली असून तातडीने बिबटय़ाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. या अगोदरही गेल्या महिन्यात काही घरांलगत बिबटय़ाचा वावर आढळला होता. त्यावेळीही वन विभागाच्या निदर्शनास बिबटय़ाचा वावर आणून दिला होता. नंतर या भागातून बिबटय़ाचा वावर कमी झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, पुन्हा तीन दिवसांपासून या भागात बिबटय़ाचा वावर वाढला आहे.