विद्यमान विजेते चेन्नई सुपरकिंग्स-उपविजेते कोलकाता नाईट रायडर्स सलामी लढतीत आमनेसामने
मुंबई / वृत्तसंस्था
गर्भश्रीमंतीचे दालन खुले करुन देणाऱया तसेच युवा-अनुभवी खेळाडूंसाठी जागतिक क्रिकेटमधील सर्वोच्च व्यासपीठ ठरत आलेल्या आयपीएल स्पर्धेला आजपासून (शनिवार दि. 26) जोरदार प्रारंभ होत असून या स्पर्धेत 2011 नंतर प्रथमच 10 संघ सहभागी होत आहेत. आज सलामी लढतीत विद्यमान विजेते चेन्नई सुपरकिंग्स व विद्यमान उपविजेते कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने भिडतील. या लढतीला येथील वानखेडे स्टेडियमवर सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे.
यंदा सहभागी 10 संघ 2 गटात विभागले गेले असून या 14 वर्षांच्या कालावधीत आयपीएल ही जागतिक स्तरावरील सर्वोत्तम लीग झाली आहे. अगदी फुटबॉलमधील आयकॉन मँचेस्टर युनायटेडने देखील नव्या प्रँचायझीसाठी प्रयत्न केले. मात्र, लिलाव प्रक्रियेत आरपीएसजी समूह व ब्रिटनस्थित सीव्हीसी समूह यशस्वी ठरले.
यंदा लखनौ सुपरजायंट्स व गुजरात टायटन्स हे दोन नवे संघ दाखल झाले असून यामुळे सामन्यांची संख्याही 60 वरुन 74 पर्यंत वाढली आहे. मात्र, प्रत्येक संघ पूर्वीप्रमाणेच प्रत्येकी 14 सामने खेळणार असून यासाठी 10 संघ दोन गटात विभागले गेले आहेत.
यापूर्वी, 2021 मधील मागील आवृत्ती कोरोनाच्या उद्रेकामुळे दोन टप्प्यात खेळवावी लागली आणि आयोजकांसाठी हा मोठा धडा होता. त्या पार्श्वभूमीवर यंदा प्राथमिक फेरीतील सर्व सामने महाराष्ट्रात (मुंबईतील 3 स्टेडियम व पुण्यातील एमसीए स्टेडियम) खेळवले जाणार असून यामुळे सहभागी संघांना विमान प्रवास करावा लागणार नाही. प्राथमिक फेरीतील सर्व सामने या चारच ठिकाणी होणार असल्याने खेळपट्टय़ा ‘रिप्रेश’ ठेवणे, हे मात्र क्युरेटर्ससमोरील मोठे आव्हान असेल.
मुंबई इंडियन्स संघातील बरेच खेळाडू नवे असतील. त्यामुळे, मुंबईत खेळण्याचा ‘होम ऍडव्हान्टेज’ मिळणार नाही, असे रोहित शर्माने यापूर्वी स्पष्ट केले. मात्र, तो स्वतः, तसेच केरॉन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, जसप्रित बुमराह व इशान किशन यांचा खेळ मुंबईत उत्तम बहरतो, याची अनेकदा उत्तम प्रचिती आली आहे. पंडय़ा बंधू व ट्रेंट बोल्ट यंदा मुंबई इंडियन्स संघात नाहीत. त्यामुळे, हा संघ किमान कागदावर तरी पूर्वीइतका बलाढय़ राहिलेला नाही, असे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघात सर्वांचे लक्ष फक्त विराट कोहलीवरच असणार आहे. नेतृत्वाचा राजीनामा दिला असल्याने त्याला यंदा फलंदाजीवर पूर्ण लक्ष केंद्रित करणे शक्य होईल. आयपीएल जेतेपदाने आरसीबीला सातत्याने हुलकावणीच दिली असून आधुनिक क्रिकेटमधील हा दिग्गज फलंदाज यंदा ही कसर भरुन काढू शकणार का, याची उत्सुकता असेल. प्रदीर्घकाळ चेन्नईकडून खेळलेल्या फॅफ डय़ू प्लेसिसकडे यावेळी आरसीबीच्या नेतृत्वाची धुरा असणार आहे.
असे असेल खेळपट्टय़ांचे स्वरुप!
वानखेडे, सीसीआय व डीवाय पाटील स्टेडियमवरील खेळपट्टय़ा लाल मातीच्या असून तेथे उसळत्या गोलंदाजीला पोषक वातावरण असेल तर पुण्यातील खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला अधिक अनुकूल असेल, असा होरा आहे.
आयपीएलमधील कामगिरीवरच ठरणार भारताचा वर्ल्डकप संघ!
यंदाचा टी-20 वर्ल्डकप ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये खेळवला जाणार असून त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय निवड समितीचे आयपीएलमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल. साहजिकच, वर्ल्डकप संघातील स्थान निश्चित करण्यासाठी यंदाची आयपीएल गाजवणे हा एकच पर्याय काही भारतीय खेळाडूंसमोर असणार आहे.
धोनीसाठी यंदा शेवटची आयपीएल?
सलामी लढतीला अवघ्या तीन दिवसांचा कालावधी बाकी असताना नेतृत्वावरुन पायउतार होणाऱया धोनीसाठी यंदाची आयपीएल कारकिर्दीतील शेवटची ठरु शकते, असे सध्याचे चित्र आहे. 40 वर्षीय धोनी तिन्ही क्रिकेट प्रकारातून यापूर्वीच निवृत्त झाला असल्याने वर्षभरात फक्त आयपीएलमधील 14-16 सामन्यात तो खेळताना दिसून येतो आहे. फिटनेस पाहता, हा त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम ठरु शकतो. दुसरीकडे, यंदा रविंद्र जडेजाकडे नेतृत्वाची सूत्रे सोपवली असली तरी हा संघ यंदाही प्रामुख्याने धोनीच्या मार्गदर्शनावरच अधिक अवलंबून असेल, हे सुस्पष्ट आहे. याची प्रचिती अगदी आजच्या पहिल्या सामन्यापासूनच दिसून येऊ शकते.
श्रेयस, केएल राहुल व हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाची पारख होणार
दिल्ली कॅपिटल्सला प्रथमच फायनलपर्यंत धडक मारुन दिल्यानंतर श्रेयस अय्यरला खांद्याच्या दुखापतीमुळे नेतृत्वावरुन बाजूला व्हावे लागले होते. त्यानंतर त्याने ऑक्शनमध्ये उतरणे पसंत केले आणि केकेआरने मोठी किंमत मोजत त्याला करारबद्ध केले. आता आपल्या अनुभवाचा लाभ घेत केकेआरला तिसरे जेतेपद मिळवून देण्याचा अय्यरचा प्रयत्न असणार आहे.
श्रेयस अय्यरचा राष्ट्रीय सहकारी हार्दिक पंडय़ाला 2019 मध्ये पाठीवर शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागल्यानंतर सातत्याने गोलंदाजी करता आलेली नाही आणि यामुळे त्याला संघातील जागा देखील गमवावी लागली. त्या पार्श्वभूमीवर, यंदाची आयपीएल त्याच्यासाठी विशेष महत्त्वाची असणार आहे. आगामी वर्ल्डकपसाठी संघात परतण्याचे लक्ष्य असेल तर हार्दिक पंडय़ाला तिन्ही आघाडय़ांवर आपण हुकुमी एक्का ठरु शकतो, हे प्रत्यक्ष कामगिरीतून दाखवून द्यावे लागणार आहे. आपली कारकीर्द ट्रकवर आणणे आणि पहिलीवहिली आयपीएल खेळत असलेल्या गुजरात संघाला अव्वल यश मिळवून देणे, अशी दुहेरी आव्हाने या अष्टपैलू खेळाडूसमोर यंदा असणार आहेत.
हार्दिकचा आप्त मित्र व संघसहकारी केएल राहुलसमोर देखील युवा खेळाडूंकडून भरीव कामगिरी करवून घेण्याचे आव्हान असणार आहे. लखनौ सुपरजायंट्स संघाचा कर्णधार या नात्याने त्याची कामगिरी कशी होईल, यावर निवड समितीचेही लक्ष असेल.
पुढील वर्षी महिला आयपीएलला प्रारंभ, यंदा 4 प्रदर्शनीय सामने
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ 2023 पर्यंत महिलांची आयपीएल स्पर्धा भरवण्याचे नियोजन करत आहे, अशी माहिती कार्यकारिणी अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी दिली. यंदा एका वर्षाच्या ब्रेकनंतर पूर्वीप्रमाणे महिला गटात 4 प्रदर्शनीय लढती खेळवल्या जाणार आहेत. उद्घाटनाच्या आयपीएल स्पर्धेत 5 ते 6 संघ असावेत, असा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. यंदा महिला गटातील सर्व प्रदर्शनीय सामने पुण्यात खेळवले जातील, अशी शक्यता आहे.