कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी भीती कायम : कोरोना नियमांचे पालन करणे अनिवार्य
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी अद्याप संसर्ग टळला नसून भीती कायम आहे. यातच राज्यात जारी करण्यात आलेला लॉकडाऊन सोमवार 14 जूनपासून शिथिल करण्यात येणार आहे. त्यानुसार कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर 5 टक्क्यांपेक्षा कमी असणारी 19 जिल्हे अनलॉक होणार आहेत. मात्र, संसर्ग अधिक असणाऱया उर्वरित 11 जिल्हय़ांमध्ये 21 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. दरम्यान, अनलॉक झालेल्या जिल्हय़ांमध्ये कोरोना नियमांचे पालन न झाल्यास मोठय़ा संकटाला तोंड द्यावे लागेल, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. त्यामुळे अनलॉकनंतर सामाजिक अंतर ठेवणे, मास्कचा नियमित वापर करणे आवश्यक आहे.
अनलॉकची घोषणा झालेल्या जिल्हय़ांमध्ये पूर्णपणे शिथिलता देण्यात आलेली नाही. जिल्हय़ांतील सर्व कारखाने 50 टक्के तर गारमेंट्स कंपन्या 30 टक्के कर्मचाऱयांच्या क्षमतेने सुरू करण्यास परवानगी आहे. दुपारी 2 पर्यंतच मद्य दुकाने, दूध, मांसविक्री, किराणा दुकाने सुरू राहणार असून हॉटेलमधून केवळ पार्सल देण्याची मुभा असणार आहे. याचबरोबर अनलॉक जिल्हय़ांमध्ये सोमवारपासूच नाईट कर्फ्यू आणि 2 दिवसांचा विकेंड कर्फ्यूही जारी राहणार आहे.
कोरोना पॉझिटिव्हिटी दर अधिक असलेल्या बेळगाव, बेंगळूर ग्रामीण, म्हैसूर, कोडगू, हासन, मंडय़ा, चामराजनगर, शिमोगा, चिक्कमंगळूर, दावणगेरे, मंगळूर या 11 जिल्हय़ांमध्ये 21 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. तर पॉझिटिव्हिटी दर 5 टक्क्यांपेक्षा कमी असलेली बेंगळूरसह 19 जिल्हे अनलॉक करण्यात येणार आहेत. या 19 जिल्हय़ांमध्ये जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याची वेळ दुपारी 2 पर्यंत वाढविण्यात आली आहे. 2 नंतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. तसेच अनलॉक जिल्हय़ांमध्ये कोणत्याही बसेस धावणार नाहीत. याचबरोबर मेट्रो सेवाही बंद राहणार आहे.
आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी
बांधकामाला परवानगी देण्यात आली असून बांधकाम क्षेत्राशी संबंधित सर्व दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत. रस्त्यावरील व्यापाऱयांनाही दुपारी 2 पर्यंतच व्यापार करण्यास परवानगी आहे. रिक्षा आणि टॅक्सी वाहतुकीला अनुमती दिली असून केवळ दोनच प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा असणार आहे. तसेच उद्याने सकाळी 5 ते 10 या कालावधीत सुरू राहतील. याचबरोबर आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी आहे.
अनलॉक झालेल्या जिल्हय़ांत
- सर्व कारखाने 50 टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू
- गारमेंट्स कंपन्या 30 टक्के कर्मचाऱयांच्या क्षमतेने सुरू
- आवश्यक वस्तूंची दुकाने, भाजी-फळेविक्री दुपारी 2 पर्यंत
- सर्व प्रकारची बांधकामे आणि या क्षेत्राशी संबंधित आस्थापने सुरू
- उद्याने सकाळी 5 ते 10 या कालावधीत खुली
- ऑटो रिक्षा, टॅक्सीतून दोन प्रवाशांना प्रवास करण्यास मुभा