अहमदाबाद / वृत्तसंस्था
भारत-इंग्लंड यांच्यात या मालिकेतील पहिल्या तिन्ही सामन्यात ज्या संघाने नाणेफेक जिंकली, त्यांनीच तो सामनाही जिंकला आहे. त्यामुळे, आजच्या लढतीत देखील तीच पुनरावृत्ती होणार का, याची उत्सुकता असेल. 5 सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या 1-2 फरकाने पिछाडीवर असून मालिकेतील अस्तित्व कायम राखण्यासाठी विजय खेचून आणण्याचे आव्हान विराटसेनेसमोर असेल. सायंकाळी 7 वाजता या लढतीला प्रारंभ होणार आहे.
नाणेफेकीचा कौलच सामन्याचा निकाल ठरवण्यात महत्त्वाचा घटक असल्याने नाणेफेक जिंकणे महत्त्वाचे असेल, हे क्रमप्राप्त असू शकेल. दस्तुरखुद्द विराट कोहलीने मात्र नाणेफेक जिंकली किंवा नाही जिंकली तरी विजय संपादन करण्यासाठीच आपल्याला निर्धाराने खेळावे लागेल, असे म्हटले आहे.
मालिकेतील दोन सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताला पराभव पत्करावे लागले. शिवाय, पॉवर प्ले षटकात देखील सातत्याने झगडावे लागले आहे. विराट कोहली व श्रेयस अय्यर यांनी प्रत्येकी एका डावात उत्तम खेळी साकारली असली तरी संघाला आव्हानात्मक धावसंख्या रचण्यात अपेक्षित यश लाभलेले नाही, ही देखील कटू वस्तुस्थिती आहे.
तिसरा अष्टपैलू निवडणार?
मार्क वूड व जोफ्रा आर्चर यांनी पहिल्या 6 षटकात भारतीय फलंदाजांना सातत्याने जखडून ठेवले असून प्रतिस्पर्ध्यांना द्विधावस्थेत खेळणे भाग पाडण्यात ते कमालीचे यशस्वी ठरले आहेत. तिसऱया सामन्यानंतर कोहलीने हार्दिक पंडय़ा, वॉशिंग्टन सुंदर यांच्यानंतर तिसरा अष्टपैलू खेळवण्याचे संकेत दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राहुल तेवातिया किंवा अक्षर पटेल यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.
चहलची महागडी गोलंदाजी
तिसऱया सामन्यात कोहलीच्या तडफदार खेळीमुळे भारताने आव्हानात्मक धावसंख्येच्या उंबरठय़ापर्यंत पोहोचण्यात यश प्राप्त केले. पण, यानंतरही भारतीय गोलंदाज ब्रिटीश फलंदाजांना अजिबात लगाम घालू शकले नाहीत, हे स्पष्ट झाले. भारताचा पहिल्या पसंतीचा फिरकीपटू यजुवेंद्र चहल दोन्ही लढतीत प्रचंड अपयशी ठरला, ही देखील चिंतेची बाब ठरली.
हार्दिक पंडय़ाने गोलंदाजी सुरु केली, ही भारतासाठी आश्वासक बाब ठरली असली तरी अद्याप त्याला एकही बळी घेता आलेला नाही. भुवनेश्वरने काटेकोर मारा केला. मात्र, संघाला त्याच्याकडून नव्या चेंडूवर सातत्याने ब्रेकथ्रू मिळवून देण्याची अपेक्षा आहे. ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरने मात्र 6.95 च्या इकॉनॉमीने 4 बळी घेतले आहेत. भारतीय संघ या मालिकेत 1-2 फरकाने पिछाडीवर असला तरी अंतिम संघात फार मोठे बदल होण्याची शक्यता या क्षणी तरी नाही.
इंग्लंड घोडदौडीसाठी सज्ज
मालिकेत आघाडीवर असल्याने निर्धास्त असलेला इंग्लंडचा संघ आजच मालिकाविजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी प्रयत्नशील असेल. जोस बटलर तडफदार पवित्र्यात असल्याने ही त्यांची मुख्य जमेची बाजू ठरली आहे. जागतिक स्तरावर कितीही कसलेल्या गोलंदाजी लाईनअपचा धुव्वा उडवण्याची त्याची क्षमता निर्विवाद आहे. यापूर्वी, दोन कसोटीत खराब फॉर्ममध्ये राहिलेल्या जॉनी बेअरस्टोने मागील लढतीत 40 धावांची खेळी साकारली. आता इंग्लंडला जागतिक क्रमवारीतील प्रथम मानांकित डेव्हिड मलानकडून फटकेबाजीच्या अपेक्षा आहेत.
सांघिक टी-20 क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान असलेल्या इंग्लंडचे साम्राज्य खालसा करण्यासाठी भारताला आज विशेष रणनीती आखावी लागेल, हे मात्र जवळपास निश्चित आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, यजुवेंद चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, दीपक चहर, राहुल तेवातिया, इशान किशन.
इंग्लंड ः इयॉन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर, जेसॉन रॉय, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, अदिल रशिद, रीस टॉपली, ख्रिस जॉर्डन, मार्क वूड, सॅम करण, टॉम करण, सॅम बिलिंग्ज, जॉनी बेअरस्टो, जोफ्रा आर्चर.
सामन्याची वेळ- सायं. 7 पासून.
थेट प्रक्षेपण- स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर.
‘मागील 2-3 वर्षातील केएल राहुलची कामगिरी अतिशय लक्षवेधी आहे. टी-20 मध्ये त्याचा खेळ विशेष बहरतो, हा इतिहास आहे. त्यामुळे, आजच्या लढतीत देखील केएल राहुल-रोहित हीच आमची पहिल्या पसंतीची सलामी जोडी असेल. आम्हाला केएलच्या खराब फॉर्मची चिंता नाही’.
-भारतीय कर्णधार विराट कोहली
या मालिकेतील नाणेफेकीचे कौल व सामन्याचे निकाल
लढत / नाणेफेकीचा कौल / निर्णय / सामन्याचा निकाल
पहिली टी-20 / इंग्लंड / प्रथम गोलंदाजी / इंग्लंड विजयी
दुसरी टी-20 / भारत / प्रथम गोलंदाजी / भारत विजयी
तिसरी टी-20 / इंग्लंड / प्रथम गोलंदाजी / इंग्लंड विजयी
विराटची केन विल्यम्सनच्या विक्रमाशी बरोबरी
मागील टी-20 सामन्यात विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने सर्वाधिक अर्धशतके फटकावणाऱया फलंदाजांच्या यादीत केन विल्यम्सनच्या विक्रमाशी बरोबरी साधली. या उभयतांच्या खात्यावर आता प्रत्येकी 11 अर्धशतके नोंद आहेत. कोहलीने याआधीच्या लढतीत टी-20 क्रिकेटमध्ये 3 हजार धावांचा टप्पाही सर केला. या छोटेखानी क्रिकेट प्रकारात सध्या त्याच्या खात्यावर 88 सामन्यात 3078 धावा नोंद आहेत.
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावणारे कर्णधार
कर्णधार / अर्धशतके / डाव / धावा / सर्वोच्च
विराट कोहली / 11 / 41 / 1421 / 94 ना.
केन विल्यम्सन / 11 / 49 / 1383 / 95
ऍरॉन फिंच / 9 / 44 / 1462 / 172
इयॉन मॉर्गन / 9 / 53 / 1317 / 91
फॅफ डय़ू प्लेसिस / 7 / 40 / 1273 / 119
कोटस
केएल राहुल सलग तीन वेळा अपयशी ठरला, म्हणून तो खराब फलंदाज ठरत नाही. कोणत्याही फलंदाजाला खराब फॉर्ममधून जावे लागते. केएलसाठी त्याच्या पाठीशी समर्थपणे उभे राहण्याची गरज आहे. तो लवकरच खराब फॉर्मची कोंडी फोडेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.
-भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड
सुर्यकुमार यादवला का वगळले, हे कोडेच आहे. विश्वचषकापूर्वी सात महिन्यांआधी त्याच्याकडून तयारी करवून घेतली जाते आणि विश्वचषक स्पर्धा उंबरठय़ावर असताना त्याला वगळले जाते, हे आश्चर्याचे आहे. खेळाडूंवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे.
-माजी सलामीवीर गौतम गंभीर
इयॉन मॉर्गनला आम्ही मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील आमचा ब्रँड ऍम्बेसिडर मानतो. त्यानेच आमच्या संघाची जडणघडण केली आहे. या मालिकेत आम्ही भक्कम स्थितीत आहोत, याचे श्रेय सर्वस्वी इयॉन मॉर्गनलाच जाते.
-इंग्लंडचा उपकर्णधार जोस बटलर