सध्या ऋ तू बदलाचा काळ आहे. थंडी संपून उन्हाळा सुरू होत आहे. या दिवसात सकाळच्या वेळात थोडी थंडी अनुभवायला मिळत असली तरी नंतर उन्हाच्या झळा बसू लागतात. या काळात सर्दी, खोकल्यासारखे आजार डोकं वर काढतात. आजारपणात पलंगावरून उठावसंही वाटत नाही. त्वचा निस्तेज दिसू लागते. डोळेही सुजतात. म्हणूनच मग ताजंतवानं आणि उत्साही वाटण्यासाठी त्वचेला पोषण देणार्या घटकांचा वापर करायला हवा. कसा? जाणून घेऊ.
आजारपणात दोन पावलं चालून तोंड धुणंही वैतागवाणं वाटतं. त्यातच ताप आल्यावर वारंवार घामही येतो. अशा वेळी हा घाम पुसण्यासाठी हायड्रेटिंग फेशियल वाईप्स वापरता येतील. नीम ऑईल, कुकंबर, कॅलेंडय़ुला तसंच ऍलोव्हेराचा सुगंध असणार्या वाईप्समुळे तुम्हाला ताजंतवानं वाटेल.
- डोकं दुखत असेल तर थंडावा आणि ताजेपणाचा अनुभव देणार्या मास्कचा वापर करता येईल. कुकंबर, पपई, लेमन, ऑरेंज फ्लेवरचे मास्क डोकेदुखीचा त्रास कमी करू शकतील.
- सर्दी, तापात त्वचा निस्तेज दिसू लागते. ओठही फुटू लागतात. त्वचेवर पुरळ उठतं. अशावेळी ई जीवनसत्त्व, एसेन्शियल ऑईल्स तसंच प्रोबायोटिक्सचा वापर उपयुक्त ठरू शकेल.
- आजारपणात रात्री झोप येत नाही. यामुळे डोळे सुजल्यासारखे वाटतात. म्हणूनच जड आय क्रीम लावण्याऐवजी डोळ्यांची सूज आणि फाईन लाईन्स दूर करणार्या मास्कचा वापर करायला हवा. मिनरल्स, अमिनो ऍसिड्स, प्लांट बेस्ड फेशियल ऑईल, कॅफेन आणि प्रथिनयुक्त मास्क उपयुक्त ठरू शकतील.
- फुटलेल्या ओठांना नवसंजीवनी देण्यासाठी लिप बामऐवजी बेरी एक्सट्रक्ट्स आणि क जीवनसत्त्वयुक्त स्क्रब्जचा वापर करा.