स्थळ-पुणे शहरातील मध्यमवर्गीय घर, काळ, इसवी सन 2070, दिवस, शाळेला लागलेल्या सुट्टय़ा वेळ-संध्याकाळची… घरात आजी-आजोबा आणि नातू होते. मुलगा आणि सून बाहेर गेले होते.
“आजोबा, तुमच्या लहानपणीच्या गमती सांगा नं,’’ बोअर झालेला नातू बोलला.
“गमती कसल्या डोंबलाच्या, खूप कष्टात दिवस काढले. आमच्यापेक्षा आमच्या आजी-आजोबांनी अधिक कष्टात दिवस काढले. आधी त्यांच्या आठवणी सांगतो. मग आमच्या वेळच्या आठवणी सांगतो. आजोबा सांगायचे की त्यांच्या वेळी म्हणे, खूप स्वस्ताई होती. सरकारने कधी नोटबंदी केली नाही, तरी लोकांच्या हातात खूप कमी नोटा असायच्या. पण लोक सुखी होते. फक्त दुधाची टंचाई असे. तांदूळ पुरेसा पिकत नव्हता. म्हणून एक पंतप्रधान दर बुधवारी जेवणातून भात वर्ज्य करीत. दिवाळीमध्ये बाजारातली साखर गायब व्हायची. गरीब मुलं रात्री फूटपाथवर रस्त्यावरच्या म्युनिसिपालटीच्या दिव्याखाली बसून अभ्यास करायची आणि परीक्षेत पहिली यायची.’’
“नंतर?’’
“वडिलांच्या पिढीतल्या लोकांनी रात्री फूटपाथवर बसून अभ्यास करायची पद्धत बंद केली. कारण म्युनिसिपालटी जाऊन मनपा आल्या होत्या. रात्रीच्या वेळी रस्त्यावरचे दिवे बंद असत आणि अनेकदा दिवसा सगळे दिवे चालू रहात. शिवाय रात्री सिनेमा नट दारू पिऊन जोरात गाडी चालवायचे. एकदा फूटपाथवर झोपलेले अनेकजण गाडीखाली मरण पावले. ती गाडी कोणत्या सिनेमा नटाने चालवली, त्या वेळी तो गाडीत होता की नाही वगैरे बऱयाच गोष्टी कोर्टात सिद्ध झाल्या नाहीत. तो विषय सोड. आमच्या मागच्या पिढीने रस्त्यावर बसून अभ्यास करणं सोडलं. अभ्यास करून परीक्षेत पास होण्यापेक्षा भजी तळणे, चहा विकणे, वडापावची गाडी लावणे, लोकांकडून वर्गणी जमवून वर्षभर विविध उत्सव साजरे करणे नगरसेवक किंवा आमदाराच्या मागे गोंडा हलवत फिरणे, फ्लेक्स लावणे, निवडणुकीत प्रचाराला आणि सभेला माणसं जमवणे, प्रचारफेरीत जाणे वगैरे रोजगार तेव्हा उपलब्ध होते.’’
“तुमच्या पिढीने काय केलं?’’ “आमच्या वेळेला नेमका कोरोना आला. आम्ही ऑनलाइन शाळा आणि अभ्यास केले. वीज पुरवून वापरायची म्हणून मोबाईलचा ब्राईटनेस कमी ठेवायचो. गरीब मुलं रेल्वे स्टेशनवरच्या मोफत वायफायखाली बसून अभ्यास करायची. गेले ते दिवस.’’ आजोबांनी सुस्कारा सोडला. तेवढय़ात बेल वाजली. मुलगा आणि सून परत आले होते.