प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या संकटछायेनंतर सर्व परिस्थिती पुर्वपदावर येत आहे. थोडी धास्ती, थोडी चिंता असली तरी जीवन जगण्यासाठी करावी लागणारी कसरत पुन्हा सुरु झाली आहे. आठवडी बाजारात प्रामुख्याने हे वास्तव अधोरेखित होत असून बाजारपेठेतील सर्व व्यवहार पुर्व पदावर येत आहेत. जीवनावश्यक साहित्यांच्या विक्री पासून सराफी पेठा संकटाला मागे टाकत उभारी घेऊ लागल्या आहेत. यामुळे बाजारपेठेला बहर आला आहे. बाजारपेठेत विक्रेता वर्ग सज्ज झाला असला तरी महाराष्ट्र, गोवा या भागातून बेळगावच्या बाजारपेठेत खेरदीसाठी येणाऱया ग्राहकांना परवानगी नसल्याने पुर्वीच्या तुलनेत आर्थिक उलाढाल कमी होत आहे.
जीवनावश्यक साहित्याची खरेदी जोरात
बाजारात केवळ जीवनावश्यक साहित्याची खरेदी करण्याकडे कल आहे. भाजीपाला, फळबाजार आणि किराणामालाचे साहित्य खेरदीसाठी नागरिकांची पावले बाजारपेठेकडे वळत आहेत. मागील आठवडयाच्या तुलनेत भाजीपाल्याच्या दरात फरक नसून पालेभाज्यांची आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत. सध्या बाजारात केळी आंबे, सफरचंद, डाळींब, केळी या फळांची विक्री जोरदार सुरु आहे. प्रामुख्याने डाळींब आणि केळी आंब्यांची आवक वाढली असल्याने डाळींब 40 ते 50 रु. किलो तर केळी आंबे 50 रु. 5 ते 6 नग याप्रमाणे विकले जात आहेत.
पावसाची विश्रांती
शनिवारी पावसाने विश्रांती घेतल्याने बाजारपेठेतील सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरु होते. आठवडी बाजारात परगावाहून खरेदीसाठी येणारे ग्राहक आणि रस्त्याच्या कडेला विविध साहित्याची विक्री करणारे विक्रेते यांना पावसाच्या व़िश्रांती मुळे दिलासा मिळाला, सकाळपासूनच बाजारपेठेत नागरकांची गर्दी झाली. यामुळे बाजारपेठेला बहर आल्याचे दिसून आहे. विशेषतः कोरोनाच्या संकटानंतर बाजारपेठेला पावसाळी साहित्याची किनार लाभली असल्याचे दिसून येत आहे. बाजारात ठिकठिकाणी मास्कची विक्री करण्याबरोबरच पावसाळी साहित्याचे जणू प्रदर्शनच भरले आहे. छत्री, रेनकोट, प्लास्टीक कागद, ताडपत्री, पावसाळी बूट, चप्पल असे विविध साहित्य गणपत गल्ली, मारुती गल्ली तसेच खडेबाजार याठिकाणी स्टॉल लावून विकले जात आहेत.
मान्सून धमाकाची भुरळ
आता सर्व वयवहार पुर्व पदावर आले आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे थंडावलेले व्यवहार आर्थिक संकटात अडकले आहे. यामुळे विविध दालने दिवसभर ग्राहकांच्या प्रतिक्षेत खुली करण्यात येत आहेत. मात्र तरीदेखील पुवीप्रमाणे खरेदी होत नसल्याने मान्सून धमाका आणि ऑफर्सची खैरात देऊन ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. मान्सून धमाक्याची भुरळ व्यवसायाला उभारी देण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याने बाजारपेठेत मोठमोठया दालनांमध्ये मान्सून धमाका अशी जाहीरात केली जात असल्याचे दिसून येत आहे.
मास्कची सक्ती.. मात्र कोरोनाची नाही भिती
कोरोनाला हारवायचे असेल तर स्वयं संरक्षण महत्वाचे आहे. शिवाय त्यातूनही सुरक्षिततच्या दृष्टीने मास्कची सक्ती करण्यात आली. आहे. मात्र बाजारपेठेचे चित्र पाहता ना मास्कची सक्ती ना सामाजिक अंतर संपुर्ण व्यवस्थेचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. नाका तोंडाला लावायचे मास्क गळयात अथवा कानाला अडकवले जात असून यामुळे कोरोनाची भिती राहिली नसल्याचे दिसून येत आहे. तर काही विक्रेत्यांकडून सर्रासपणे पणे विना मास्क साहित्याची विक्री केली जात आहे. शिवाय सामाजिक अंतराचा फज्जा उडाला असून ठिकठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे कोरोनाला हरवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळत नसून मास्कची सक्ती असली तरी कोरोनाची भिती मात्र राहिली नसल्याचे दिसून येत आहे.