कोरोना नियंत्रणासाठी रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत कठोर निर्बंध
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना नियंत्रणासाठी राज्यातील आठ शहरांमध्ये रात्रीच्या वेळी कोरोना कर्फ्यु जारी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून शनिवार दि. 10 एप्रिलपासून पुढील दहा दिवसांपर्यंत त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी मार्गसूची जारी करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना कर्फ्यु लागू होणाऱया आठ शहरांच्या कार्यकक्षेत कठोर निर्बंध असणार आहेत. तथापि, अत्यावश्यक सेवांना यातून सूट देण्यात आली आहे.
राज्यातील बेंगळूर शहर, गुलबर्गा, मंगळूर, उडुपी, मणिपाल, म्हैसूर, बिदर आणि तुमकूर या आठ शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार राज्य सरकारने गुरुवारी रात्री कोरोना कर्फ्यु (नाईट कर्फ्यु) जारी करण्याची घोषणा केली. त्यासंबंधी शुक्रवारी सरकारने मार्गसूची जारी केली आहे. त्यानुसार शनिवार दि. 10 एप्रिलपासून दररोज रात्री 10 ते पहाटे 5 या कालावधीत कोरोना कर्फ्यु असणाऱया शहरांमध्ये कठोर निर्बंध जारी करण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी अत्यावश्यक सेवा वगळता संचार करणे, व्यवहार सुरू ठेवण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. कारखाने, कंपन्या, रात्री कामे करणाऱया संस्था सुरू ठेवण्यास अनुमती देण्यात आली आहे. 20 एप्रिलपर्यंत हे निर्बंध जारी राहणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बस, रेल्वे, विमानसेवा सुरू राहणार
प्रवाशांना घरातून बसस्थानक, विमानतळ किंवा रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी तिकिटांच्या आधारे रिक्षा, कॅब व इतर वाहनांचा वापर करण्यास मुभा देण्यात आली आहे. आजारी असणाऱया रुग्णांना आणि त्यांच्या साहाय्यकांना वैद्यकीय सेवेसाठी इस्पितळापर्यंत जाण्यासाठी मुभा असणार आहे.
राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण कायदा 2005 मधील कलम 24 नुसार असणाऱया अधिकाराचा वापर करून राज्य सरकारने शनिवारपासून 10 दिवस सात जिल्हय़ांमधील आठ शहरांमध्ये कोरोना कर्फ्यु लागू केला आहे. याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनांना देण्यात आले आहेत.
कोणत्या सेवा बंद… कशाला परवानगी…!
- आवश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद
- अत्यंत निकडीच्या प्रसंगी रात्री घराबाहेर येण्याची मुभा
- कारखाने, कंपन्या, संस्थांमध्ये काम करणाऱयांना काम करण्याची मुभा
- रात्रपाळीत काम करणाऱयांना ओळखत्र व इतर कागदपत्रे आवश्यक
- रात्री 10 नंतर सर्व व्यापार, व्यवहार बंद
- रात्री 10 नंतर सर्व दुकाने, हॉटेल, पब बंद
- मालवाहतूक वाहनांना संचार करण्यास परवानगी
- रात्रीच्या वेळेस बस, रेल्वे, विमानप्रवास करता येणार
- होम डिलिव्हरी, ई-कॉमर्स वाहनांना परवानगी
- रस्त्याकडेला असणारे फास्टफूड स्ट्रिटही बंद