मिरजेतील नवरात्र संगीत उत्सव आता ऑनलाईन, कोरोनामुळे निर्णय, स्थानिक कलाकारांचा सहभाग
प्रतिनिधी/मिरज
कोरोनाच्या संकटामुळे मालगाव वेसमधील ऐतिहासिक अंबाबाई मंदिरातील प्रसिध्द नवरात्र संगीत महोत्सवावर यंदा प्रथमच मंदिराच्या प्रांगणात न होता तो थेट सोशल मिडीयावर प्रक्षेपित केला जाणार आहे. 66 वर्षांच्या इतिहासात प्रथमच अशा पध्दतीने संगीत महोत्सव होत आहे. शासनाने घातलेले निर्बंध आणि कोरोना प्रसाराची भीती यामुळे हा निर्णय संयोजकांना घ्यावा लागला आहे. यंदा संगीत रसिकांना घरबसल्या या उत्सवाचा आनंद घेता येणार आहे.
शहरातील मालगांव वेशीमधील अंबाबाई मंदिरात नवरात्रीमध्ये आयोजित केला जाणारा संगीत महोत्सव देशभर प्रसिध्द आहे. यंदा या महोत्सवाचे 67 वे वर्ष आहे. 1954 साली सुरू झालेल्या या महोत्सवात देशभरातील अनेक नामांकित गायक-वादकांनी संगीतसेवा केली आहे. हा महोत्सव जिल्ह्याचे एक सांस्कृतिक वैशिष्ट्य बनला आहे. अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाची ख्याती राज्यभर पसरली आहे. अखिल भारतीय स्वरूपाला पोहचलेल्या या महोत्सवावर यंदा मात्र, कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे.
मात्र, संगीत महोत्सवाच्या संयोजकांनी यावर पर्याय शोधला आहे. संगीत महोत्सव मंदिराच्या प्रांगणात न घेता तो फेसबुक, यु-टय़ूब, इन्स्टाग्राम याद्वारे थेट प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महोत्सवासाठी दरवर्षी प्रमाणे देशभरातील कलाकार न बोलाविता स्थानिक कलाकारांवरच कार्यक्रम होणार आहे. पहिल्या दिवशी ज्येष्ठ गायक पं. हृषिकेश बोडस यांचे गायन होणार आहे. त्यानंतर सांगली-मिरजेतील गायक, वादक, कलाकारांचे कार्यक्रम होणार आहेत. प्रथमच अशा पध्दतीने कार्यक्रम करण्यात येत आहे. संगीत रसिकांनी याचा घर बसल्या लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. दरम्यान, उत्सव समितीच्या वतीने दिला जाणारा संगीतकार राम कदम पुरस्कार यंदा केदार परांजपे (पुणे) यांना जाहीर झाला आहे.