प्रतिनिधी / गोडोली, सातारा
ग्रामपंचायतीचा कारभार करताना येणाऱ्या अडचणी, तक्रारी सोडवून करण्याबरोबरच विकास कामांना अधिक चालना देण्यासाठी दर तीन महिन्यांनी तालुका पातळीवर सरपंच सभा आयोजित केली जाणार आहे. गटविकास अधिकार्यांनी या सभेचे आयोजन करुन त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करावा लागणार आहे. ग्रामीण विकास सक्षम होण्यासाठी शासनाने घेतलेल्या सरपंच सभेच्या निर्णयामुळे तक्रारींचा निपटारा आणि विकासाला चालना मिळणार आहे.
ग्रामीण विकास अधिक सक्षम करण्यासाठी शासन अनेक निर्णय घेत आहे. आतापर्यंत सरपंचांच्या अडचणी, तक्रारी सोडवण्यासाठी उपसभापती यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरावर सरपंच समिती नेमली जात होती. मात्र हि समिती प्रभावी ठरत नसल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी तालुका स्तरावर दर तीन महिन्यांनी सरपंच सभा घ्यावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. दि. ९ फेब्रुवारी रोजी सरपंच सभेबाबत परिपत्रक जारी झाले आहे. सरपंच सभेदरम्यान ग्रामपंचायतीची कामे वेळेवर होण्यासाठी संबंधित पंचायत समिती विस्तार अधिकारी (पंचायत), इतर कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक यांची आढावा बैठक होईल. ग्रामपंचायतीची कामे तक्रारी,गाऱ्हाणी, अडचणींतून मार्ग काढला जाईल.
तक्रार निवारण दिनादिवशी सरपंच सभेनंतर गटविकास अधिकारी हे सभेचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी हे सर्व तालुक्यातील सभेचा अनुपालन अहवाल एकत्रित विभागीय आयुक्त यांना सात दिवसात सादर करतील. त्याचबरोबर तेच अहवाल शासनास दहा दिवसात सादर होणार आहेत.