मोदी सरकार पुन्हा टार्गेट : सावधगिरीचाही इशारा
न्यूयॉर्क / वृत्तसंस्था
भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. पूर्वी नोटाबंदीच्या निर्णयावरून वेळोवेळी त्रुटी दाखवून देणाऱया रघुराम राजन यांनी आता ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेसंबंधी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. परदेशी माल स्वदेशी मालाच्या स्पर्धेत उतरू नये यासाठी स्वदेशी मालास सरकारने दिलेले संरक्षण घातक ठरणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, अशी सतर्कता राजन यांनी व्यक्त केली आहे. तसेच केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेचे परिणाम संरक्षणवादात अडकू नयेत, असेही ते म्हणाले. आर्थिक संशोधन संस्था इक्रियरच्या ऑनलाईन कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे भाष्य केले आहे.
कोरोनाच्या संसर्गानंतर ढासळलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी ‘आत्मनिर्भर भारत’ची घोषणा केली होती. या योजनेला अनुसरून राजन यांनी सरकारला काही सूचक इशारे दिले आहेत. अशाप्रकारच्या धोरणांचा अवलंब यापूर्वीही केला गेला होता. परंतु त्याचा कोणताही फायदा झाला नाही. केंद्र सरकारला आत्मनिर्भर भारतामधून नक्की काय म्हणायचे आहे, हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. उत्पादनासाठी वातावरण तयार करण्याविषयी जर हे असेल तर ते ‘मेक इन इंडिया’ हा उपक्रम सादर करण्यासारखेच असल्याचे राजन म्हणाले. संरक्षणवादाचा जर हा मुद्दा असेल तर दुर्दैवाने भारताने अलीकडेच दरवाढ केली आहे. तसेच आपल्याकडे यापूर्वी लायसन्स परमिट व्यवस्था होती. ती पद्धत संरक्षणवादाची समस्या निर्माण करणारी होती. त्यामुळे काही कंपन्यांना फायदा झाला, परंतु काहींसाठी ते समस्या निर्माण करणारे ठरल्याचे राजन म्हणाले. जागतिक उत्पादन यंत्रणेची भारताला आवश्यकता आहे आणि याचा अर्थ देशातील उत्पादकांना स्वस्त आयातीचा मार्ग मोकळा असावा. वास्तवाकडे पाहिले तर भक्कम निर्यातीचा हे आधार बनू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.