‘तरुण भारत’ वृत्ताची दखल : नाल्याचे बांधकाम करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
आनंदनगर नाल्यामधील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी दूषित झाले आहे. याबाबत तक्रार करण्यात आल्याने नाल्याच्या स्वच्छतेचे काम सोमवारपासून हाती घेण्यात आले आहे. सदर नाल्याची स्वच्छता व्यवस्थित करून नागरिकांच्या समस्यांचे निवारण करावे, अशी मागणी होत आहे.
आनंदनगर परिसरात सांडपाण्याची समस्या मोठय़ाप्रमाणात भेडसावत असून नाल्याचे बांधकाम करण्यात आले नाही. तर काही ठिकाणी डेनेजचे सांडपाणी नाल्यामधून वाहत आहे. नाल्यावर ठिकठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. काही ठिकाणी नाल्यामध्ये कचरा टाकण्यात आला आहे. परिणामी ठिकठिकाणी सांडपाणी साचून रहात असल्याने विहिरी व कूपनलिकांमध्ये सांडपाणी पाझरत आहे. त्यामुळे विहिरी व कूपनलिकांचे पाणी दूषित झाले आहे. सदर नाल्याची स्वच्छता करून बांधकाम करण्यात यावे. जेणेकरून पाणी दूषित होणार नाही. त्यामुळे तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. याची दखल घेऊन सोमवारी नाल्याच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले. नाल्यामध्ये टाकण्यात आलेला कचरा हटविण्याचे काम हाती घेण्यात आले.