मुंबई/प्रतिनिधी
अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव जोडीच्या नात्यात दुरावा आला आहे. जवळपास १५ वर्षांच्या वैवाहिक नात्यानंतर अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी हे नातं संपुष्टात आणलं आहे. शनिवारी या दोघांनीही त्यांच्या या निर्णयाची अधिकृत घोषणा केली.
‘या सुंदर १५ वर्षांमध्ये आम्ही आयुष्यभराचा आनंद, हास्य यांचा अनुभव घेतला आणि त्यातून या नात्यात एकमेकांविषयी आदर, प्रेम आणि विश्वास वाढला. आता आम्हाला आमच्या आयुष्यातील एक नवीन प्रवास सुरू करायचा आहे. पण पती-पत्नी म्हणून नाही तर पालक आणि एकमेकांचे कुटुंब म्हणून’, असं आमिर आणि किरणने स्पष्ट केलं आहे. तसेच आम्ही चित्रपट, पाणी फाऊंडेशन आणि इतर प्रकल्पांमध्ये सहयोगी म्हणून काम करू.” असं या जोडप्याने संयुक्त निवेदनात म्हटले आहे.
‘विभक्त होण्याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती आणि आता आम्ही दोघं वेगवेगळे राहत आहोत. मुलगा आझादचं संगोपन आम्ही दोघं मिळून करणार आहोत. कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींचे खूप आभार, कारण त्यांनी या निर्णयात आमची साथ दिली आणि आम्हाला समजून घेतलं. आमच्या हितचिंतकांनीही शुभेच्छा आणि आशीर्वाद आम्हाला द्याव्यात. घटस्फोट म्हणजे शेवट नसून एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे’, असं त्यांनी पुढे म्हटलं.