जिल्हा बँक वारणा प्रचार सभेत २३२ ठराव धारक उपस्थित : विनय कोरे
वारणानगर / प्रतिनिधी
आम्ही जनतेचे सेवेकरी आहोत अदानी-अंबानी नव्हे असा पलटवार कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मंत्री ना. हसन मुश्रीफ यानी विरोधी परिवर्तन आघाडीने केलेल्या आरोपावर केला. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होत असताना केवळ शिवसेनेच्या हट्टापायी निवडणूक लादली असून याची जनतेने दखल घ्यावी असे आवाहनसुद्धा ना. मुश्रीफ यानी केले.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या छत्रपती शेतकरी विकास आघाडीच्या पन्हाळा तालुक्यातील मतदारांचा मेळावा आज विनय कोरे क्रीडा व सांस्कृतिक केंद्रात झाला त्यावेळी ना. मुश्रीफ बोलत होते. ते पुढे म्हणाले राजर्षि शाहू शेतकरी विकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त करून जिल्हा बँकेने अडचणीतून मार्ग काढत ती पुढे सक्षम करण्यात संचालक मंडळाचे योगदान असून यापूढे शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीक कर्ज देण्यासाठी प्रयत्न राहील, बँकेच्या १० हजार कोटी ठेवी होण्यासाठी वाटचाल सुरू असून शेतकरी विकासासाठी तरुणांना उद्योगधंदे यासाठी विविध योजना राबविणार आहे असे ना. मुश्रीफ यानी सांगितले. पालकमंत्री बंटी पाटील म्हणाले, जिल्हा बँकेत शेतकऱ्यांचा घामाचा पैसा असून ही बँक टिकविण्यासठी मुश्रीफ यांनी चांगले प्रयत्न केले. बँक राजकारण विरहीत असावी यासाठी प्रयत्न केला असल्याचे सांगीतले.
पन्हाळा तालुक्यातील २४४ ठराव धारकापैकी २३२ ठराव धारक उपस्थीत असल्यामुळे विजयाला अडचण नाही असा दावा आमदार विनय कोरे यानी करून निवडणुका बिनविरोध झाल्यानंतरही निवडणूक प्रक्रियेपोटी ३० हजार रुपये घेतले जाते ही रक्कम संस्थेच्या दृष्टीने मोठी असते ती रक्कम घेवू नये यासाठी ना. मुश्रीफ व ना. सतेज पाटील यांनी प्रयत्न करावा. मला बिनविरोध होण्यापेक्षा मी लोकशाही मार्गाने विजय होण्यात मला आनंद आहे जिल्हा बँक हे शेतकऱ्यांची मंदीर आहे. या मंदीरात सामंजस्यपणे निवडणूक बिनविरोध व्हावी असे सर्वांचे मत असताना राजकीय मतभेद व प्रतिष्ठेसाठी शिवसेनेने निवडणुक लादल्याचा आरोप त्यानी केला. बँकेने स्वतःची विमा कंपनी स्थापून शेतकऱ्यांना कमी मोबादल्यात अधिक लाभ झाला पाहीजे. हॉलंड मधील रॅबो बँकेच्या धर्तीवर जिल्हा बँकेचा विस्तार करावा असे कोरे यांनी सांगून शेतकऱ्यांना अधिक सोयी उपलब्ध करून आपली बँक देशात शक्तीशाली बनवूया असे आवाहन आ.विनय कोरे यानी केले.
व्यासपीठावर पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी एन पाटील, आमदार प्रकाश आवाडे, राजूबाबा आवळे, माजी खासदार निवेदिता माने, गोकूळचे संचालक अमरसिंह पाटील, जनसुराज्याचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, पन्हाळ्याच्या सभापती वैशाली पाटील आदीची उपस्थिती या मेळाव्यास होती. आमदार पीएन पाटील प्रकाश आवाडे यांचे सह नेत्यांची मनोगते झाली.प्रारंभी गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अॅड. शाहू काटकर यांनी आभार मानले.यावेळी छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे सर्व उमेदवार, मतदार उपस्थित होते.