मुंबई \ ऑनलाईन टीम
तौक्ते चक्रीवादळामुळे बॉम्बे हाय परिसरात अडकलेल्या कर्मचाऱ्यांचे बचावकार्य सुरु आहे. हिरा ऑईल फील्डमधील ‘बार्ज पी- 305’ वर अडकलेल्या जवळपास 184 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात तटरक्षक दल आणि शोध पथकांना यश आलं आहे. भारतीय नौदलाच्या आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता या युद्धनौका, तसंच ग्रेटशिप अहिल्या आणि ओशन एनर्जी या जहाजांच्या सहाय्याने समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे.
अरबी समुद्रात रेस्क्यू ऑपररेशन अद्यापही सुरुच आहे. बार्ज पी – 305 वरील काही जणांनी आपला जीव वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या होत्या. सोमवारी रात्रीपासून हे बचाव कार्य सुरू असून, अद्यापही सुरू आहे. खवळेल्या समुद्रात ही शोध मोहीम राबवत युद्धनौकांनी ‘बार्ज पी- 305’तराफ्यावरील 184 कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढलं. 184 कर्मचाऱ्यांना घेऊन आयएनएस कोची बुधवारी सकाळी मुंबईच्या किनाऱ्यावर दाखल झाली. त्यानंतर मृत्यूला समोर पाहिलेल्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. किनाऱ्यावर उतरल्यानंतर हे कर्मचारी बसने रवाना झाले. पण, तब्बल अकरा तास समुद्रात तग धरून भीती दडपून टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांना भावना अनावर झाल्या व अश्रूंना वाट मोकळी करून दिली. नौदलाचे खूप खूप धन्यवाद! त्यांच्यामुळेच आम्ही जिवंत आहोत, नाहीतरी कुणीही वाचलं नसतं. सगळ्यांची माझ्यासारखीच अवस्था असल्याचे सांगत त्यांना अश्रू अनावर झाले.
बार्ज बुडत होते, म्हणून मला समुद्रात उडी मारावी लागली. मी 11 तास समुद्रात होतो. त्यानंतर नेव्हीने आम्हाला वाचवले, असे क्रू मेंबर अमित कुमार कुशवाहा याने सांगितले.