नवी दिल्ली
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दाक्षिणात्य राज्यांमध्ये इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या अस्तित्वासंबंधी 17 गुन्हे नोंदविले असून 122 जणांना अटक केल्याची माहिती केंद्र सरकारने राज्यसभेत एका प्रश्नाचे लेखी उत्तर देत दिली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी राज्यसभेत ही माहिती दिली आहे.दक्षिण भारतातील विविध राज्यांमधून काही जण इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याची माहिती यंत्रणांना मिळाली आहे. एनआयएने तेलंगणा, केरळ, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूत इस्लामिक स्टेटच्या अस्तित्वासंबंधी कारवाई केल्याचे रेड्डी यांनी सांगितले आहे. केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये इस्लामिक स्टेट सर्वाधिक सक्रीय असल्याचे एनआयएच्या तपासात आढळून आले आहे.
समाजमाध्यमांमुळे नुकसान
स्वतःची विचारसरणी फैलावण्यासाठी इस्लामिक स्टेट इंटरनेट आधारित विविध समाजमाध्यम व्यासपीठांचा वापर करत आहे. याचमुळे संबंधित यंत्रणा सायबर स्पेसवर सातत्याने देखरेख ठेवून आहेत. संबंधित हस्तकांना कशाप्रकारे आर्थिक मदत पोहोचविली जात आहे आणि त्यांना दहशतवादी कारवायांसाठी विदेशातून कशाप्रकारे मदत मिळतेय याची माहिती सरकारकडे असल्याचे रेड्डी यांनी सांगितले आहे.
बंदीचा निर्णय
इस्लामिक स्टेट, इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेवांत, इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया, दाएश, इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रॉविन्स, आयएसआयएस विलायत खोरासान, इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि शाम-खोरासानला केंद्र सरकारने अवैध कारवाया प्रतिबंधक कायदा 1967 च्या अंतगंत प्रथम अनुसूचीत सामील करून त्यांना दहशतवादी संघटना घोषित पेले आहे.