वार्ताहर/ राजापूर
राजापूर तालुक्यातील आंबोळगड येथील प्रस्तावित आयलॉग प्रकल्पाच्या विरोधात व आंबोळगडमधील जैवविविधतेच्या रक्षणासाठी 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जनहक्क सेवा समितीच्यावतीने राजापूर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
नाटे ते आंबोळगड या समुद्र किनाऱयावर आयलॉग कंपनीतर्फे बंदर उभारण्यात येणार आहे. या बंदरासाठी कंपनीकडून जागेची खरेदीही करण्यात आलेली आहे. 2017 मध्ये या प्रकल्पासाठी ज्यावेळी जनसुनावणी घेण्यात आली तेव्हा पर्यावरणीय अहवाल मराठीतच हवा, अशी लेखी मागणी करत स्थानिकांनी या सुनावणीला विरोध करत जनसुनावणी उधळून लावली होती. त्यानंतर कंपनीने इंग्रजीसह, मराठीत अनुवाद केलेल्या पर्यावरणीय अहवालाच्या प्रती देत जानेवारी 2019मध्ये पुन्हा जनसुनावणी घेतली. यावेळीही परिसरातील जनतेने विरोध दर्शविला, मात्र प्रशासनाने जनसुनावणीची प्रक्रिया पूर्ण केली होती.
त्यानंतर जवळपास वर्षभर आयलॉग प्रकल्पविरोधक शांत होते. मात्र आता पुन्हा एकदा या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येणार आहे. आंबोळगड परिसर जैवविविधता वारसा स्थळ घोषित करावा म्हणून जैव विविधता मंडळ महाराष्ट्र राज्य, यांच्याकडे प्रस्ताव गेलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारपर्यंत विशेषतः पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत आंबोळगडाच्या जैवविविधतेचा आवाज पोहचवण्यासाठी राजापूर तहसील कार्यालयावर हा महामोर्चा काढण्यात येणार आहे.