जान्हवी पाटील/ रत्नागिरी
प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी गतवर्षी केंद्र शासनाने ‘आयुषमान भारत’ योजना देशभर सुरू केली. मात्र या योजनेला रत्नागिरी जिल्हय़ात अत्यंत थंडा प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेसाठी खासगी हॉस्पिटलने आरोग्य भवनकडे नोंदणीच केली नसल्याने केवळ जिल्हा शासकीय रूग्णालय व डेरवण येथील वालावलकर रूग्णालय या दोनच ठिकाणी ही योजना राबवली जात आहे. या योजनेसाठी जिल्हय़ातील 40 हजार लोकांनी स्मार्टकार्ड घेतली असली तरी केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच रूग्णांना याचा लाभ मिळाला आहे.
कोणत्याही रूग्णाला पैशांअभावी आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागू नये यासाठी केंद्र सरकाने आयुषमान भारत योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत 5 लाख रूपयांपर्यतचे वैद्यकीय उपचार मोफत दिले जातात. देशभरात तब्बल 74 लाख 84 हजार रूग्णांनी या योजनेला लाभ घेतला आहे. मात्र कोकणात विशेषतः रत्नागिरीत मात्र खासगी रूग्णालयांनी यासाठीची नोंदणी केली नसल्याने थंडा प्रतिसाद मिळाला आहे.
आgयषमान भारत योजनेआधीपासून जिल्हय़ात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू आहे. या योजनेत सिव्हील हॉस्पीटलसह लाईफकेअर हॉस्पीटल ऍण्ड रिसर्च इन्स्टिटय़ुट, परकार हॉस्पीटल, दीनदयाळ उपाध्याय हॉस्पीटल, लोटलीकर हॉस्पीटल व वालावलकर हॉस्पीटलचा समावेश आहे. मात्र नव्याने निघालेल्या आयुषमान भारत योजनेसाठी एकाही खासगी हॉस्पीटलने अद्यापपर्यंत नोंदणी केली नसून त्यामुळे रत्नागिरीतील रूग्णांना सिव्हील व वालावलकर हॉस्पीटलवर अवलंबून रहावे लागत आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयात तज्ञ नसल्याने किरकोळ शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र बायपास सारख्या शस्त्रक्रियांसाठी वालावलकर हॉस्पीटलचा एकमेव पर्याय उपलब्ध आहे.
‘आयुषमान भारत’ योजनेचे कार्ड जिल्हय़ातील 40 हजार लोकांना देण्यात आले आहे. मात्र सुविधायुक्त हॉस्पिटल नसल्याने मोजक्याच रूग्णांना याचा फायदा घेता आहे. जिल्हय़ातील मोठय़ा हॉस्पीटल्सनी आरोग्य भवनाकडे या योजनेसाठी नावनोंदणी केल्यास हजारो रूग्णांना या योजनेंतर्गत उपचार मिळू शकतात.
देशभरात 12 कोटी स्मार्ट कार्ड
देशात आयुषमान योजनेंतर्गत तब्बल 11 कोटी 86 लाख 16 हजार लोकांना स्मार्टकार्ड दिले गेले आहे. यामध्ये 74 लाख 84 हजार 202 रूग्णांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे.