पदापर्णातच केला विधानसभेत प्रवेश : मतसंख्येत प्रस्थापितांनाही टाकले मागे,विरेश बोरकर ठरले पहिले आमदार
जय उत्तम नाईक /पणजी
उजो, उजो, अशी आरोळी देत गोमंतकीयांच्या हृदयात स्वाभिमानाची ज्योत पेटवणाऱया रिव्होल्युशनरी गोवा या पक्षाने पदार्पणातच विधानसभेत प्रवेश करण्यात यश मिळविले आहे. भलेही त्यांचा एकच उमेदवार विजयी झाला असेल, तरीही अन्य मतदारसंघात त्यांनी जी मते मिळविली आहेत ती संख्या थक्क करणारी आहे.
बिगर गोमंतकीयांच्या हातात जाणारे गोमंतकीयत्व टिकवून ठेवणे, येथील उद्योग-धंदे – जमिनी स्थानिकांच्याच हाती राहाव्यात यासाठी जीवाचे रान करणाऱया आरजीच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत उतरून नशिबाची पारखणी करण्याचा निर्धार केला. त्यासाठी आधी स्वतःच्या संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्याचे प्रयत्न केले. सुदैवाने ऐन निवडणुकीच्या तोंडावरच त्यांना मान्यता मिळाली व पूर्ण जोशाने त्यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली. तब्बल 38 मतदारसंघातून उमेदवार उतरवले आणि तीन अंकी संख्येचे किरकोळ अपवाद वगळता अन्य सर्वत्र चारअंकी संख्येने मते मिळवून जोरदार मुसंडी मारली. त्याचबरोबर सांत आंद्रे मतदारसंघातून अनपेक्षित असा विजय संपादन करून विधानसभेत प्रवेशही केला.
आरजीचे प्रस्थ जबरदस्त
हे एकुण चित्र पाहता राज्यात आरजीचे प्रस्थ जबरदस्त वाढले असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज जेथे पैशांविना निवडणूक लढविता येत नाही या विचारातून तरुणाई राजकीय क्षेत्रात उतरण्यास धजत नाही, तेथे आरजीने नव्या दमाचे आणि सळसळत्या रक्ताचे तरुण कार्यकर्ते निवडणूक रिंगणात उतरवून तो समज खोटा ठरविला आहे. स्वतःकडे कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना केवळ मतदारांच्या विश्वासावर त्यांनी हे धाडस केले आणि त्याच भरवशाच्या जोरावर जी गरूडझेप घेतली आहे ती बुजूर्ग राजकीय विश्लेषकांनासुद्धा विचार करण्यास लावणारी आहे.
टीकाकारांची तोंडात बोटे
खरे तर प्रारंभीच्या काळात लोकांनी आरजीला कवडीमोलच ठरविले होते. जेथे प्रस्थापितांनासुद्धा निवडणूक लढविताना नाकेनऊ येतात तेथे हे तरुण कोणते दिवे लावणार, असे हेटाळणीचे सूरच आळवले होते. यांचा राजकीय प्रवेश हा स्वतः जिंकण्यासाठी नव्हे तर विरोधकांशी हातमिळवणी करून जिंकणाऱया उमेदवाराच्या पाडावासाठी सेटिंग करण्यासाठी आहे, अशी बोचरी टीकाही बऱयाच ठिकाणी झाली होती. परंतु आज आरजीच्या उमेदवारांनी पदार्पणातच जी मतसंख्या प्राप्त केली आहे ती टीकाकारांनाही तोंडात बोटे घालण्यास लावणारी आहे.
विद्यमान आमदारांपेक्षा आरजी सरस
आरजीच्या उमेदवारांनी काही मतदारसंघात तेथील विद्यमान आमदारास मिळालेल्या मतांपेक्षाही जास्त मते मिळविली असल्याचे दिसून आले आहे. सर्वाधिक उमेदवार असलेल्या शिवोली मतदारसंघात जेथे विद्यमान आमदारास केवळ 409 मते मिळाली तेथे आरजीच्या गौरेश मांद्रेकर याला तब्बल 3188 मते मिळाली आहेत. असाच प्रकार वेळ्ळीतूनही दिसून आला असून आरजीच्या उमेदवारास 3635 मते मिळाली आहेत तर विद्यमान आमदार तथा मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज पाचव्या स्थानी गेले आहेत.
शिरोडय़ात महाप्रस्थांसमोर उभे केले तगडे आव्हान
शिरोडा मतदारसंघात सुभाष शिरोडकर (विजयी) आणि महादेव नाईक (द्वितीय स्थानी) या दोन महाप्रस्थांसमोर तगडे आव्हान उभे केले ते आरजीच्याच उमेदवाराने. त्यांच्या शैलेश नाईक यांना तब्बल 5063 (तृतीय स्थान) मते मिळाली तर असाच चमत्कार मडकई मतदारसंघात प्रेमानंद गावडे यांनी करून दाखवला. सहा वेळा अखंडित विजयी होणारे बलाढय़ उमेदवार सुदिन ढवळीकर यांच्यासमोर त्यांचा निभाव लागला नसला तरीही 3488 मते मिळवून भाजपा उमेदवारास (4000 मते) मात्र निश्चितच जबरदस्त टक्कर दिली. यावरून राज्यात आरजीचे प्रस्थ जबरदस्त वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.
मनोज परबांचा परभवातही विजय
ज्यांच्या नेतृत्वाखाली आरजीने ही निवडणूक लढविली त्या तुकाराम (मनोज) परब यांनी तर थेट दोन मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे धाडस दाखविले आणि दोन्ही ठिकाणी त्यांनी पाच हजारांपेक्षा जास्त मते मिळविली. वाळपईचे अनभिषिक्त सम्राट असा दरारा असलेल्या विश्वजित राणे यांच्याशी दोन हात करण्याचे धाडस दाखवत त्यांनी थोडी थोडकी नव्हे तर चक्क 6377 मते मिळविली. त्याचबरोबर थिवीतूनही निवडणूक लढवत 5051 मते मिळविली. यावरून मतदारांचा त्यांच्यावर आणि त्यांचा मतदारांवर किती विश्वास होता याची प्रचिती येते.
वाळपईतून मिळविली सहा हजारांपेक्षा जास्त मते!
नुवे मतदारसंघात आरजीने चार हजारांपेक्षा जास्त मते मिळविली तर शिवोलीसह मये, पर्ये, मडकई, कुडतरी, बाणावली, वेळ्ळी, या मतदारसंघात प्रत्येकी तीन हजारांपेक्षा जास्त मते मिळविली. त्याशिवाय पेडणे, कळंगूट, सांताक्रूझ, कुंभारजुवा, प्रियोळ, कुठ्ठाळी, नावेली, कुंकळ्ळी, कुडचडे, सावर्डे या मतसंघात प्रत्येकी दोन हजारांपेक्षा जास्त मते प्राप्त केली आहेत. मांद्रे, साळगाव, ताळगाव, फोंडा, दाबोळी, फातोर्डा, केपे, सांगे, काणकोण या मतदारसंघातून प्रत्येकी 1100 ते 1900 दरम्यान मते मिळविली आहेत.
हे एकूण चित्र पाहता आरजीचे समाजकार्य याच गतीने चालू राहिल्यास पुढील निवडणुकीत त्यांचे विधानसभेतील संख्याबळ आणि राजकीय दरारा खात्रीने वाढणार यात शंका नाही.
विविध मतदारसंघात आरजीच्या उमेदवारांना मिळालेली मते
उत्तर गोवा
मांद्रे – 1219, पेडणे – 2755, डिचोली – 593, थिवी – 5051, म्हापसा – 996, शिवोली – 3188, साळगाव – 1928, कळंगूट – 2538, पणजी – 359, ताळगाव – 1651, सांताक्रूझ – 2497, सांत आंद्रे – 5395 (विजयी), कुंभारजुवा – 2442, मये – 3974, सांखळी – 742, पर्ये – 3513, वाळपई – 6377.
दक्षिण गोवा
प्रियोळ – 2517, फोंडा – 1770, शिरोडा – 5063, मडकई – 3488, मुरगाव – 130, वास्को – 851, दाबोळी – 1129, कुठ्ठाळी – 2480, नुवे – 4348, कुडतरी – 3479, फातोर्डा – 1556, मडगाव – 722, बाणावली – 3854, नावेली – 2086, कुंकळ्ळी – 2430, वेळ्ळी – 3635, केपे – 1144, कुडचडे – 2103, सावर्डे – 2135, सांगे – 1500, काणकोण – 1599.