वार्ताहर / चिपळूण :
शिरळ पंपहाऊसमधून गुहागर तालुक्यातील ‘आरजीपीपीएल’ कंपनीला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन मंगळवारी रात्री कोंढे येथे पुन्हा फुटल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेली काही वर्षे हा प्रकार वारंवार घडत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. त्यामुळे धोकादायक बनलेली ही पाईपलाईन तत्काळ हटवण्यात यावी, अशी मागणी कोंढे गावातून केली जात आहे.
तालुक्यातील भागाडी ते फैसल बाग परिसरापर्यंत पाईपलाईन फुटण्याचा प्रकार सातत्याने घडत आहे. कोंढे परिसर तर यासाठी केंद्रबिंदूच बनला आहे. या परिसरात लोकवस्तीतून पाण्याची पाईपलाईन गेली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे. काही महिन्यांपूर्वीच भागाडी, कोंढे, दलवाई हायस्कूल परिसरातील कमकुवत झालेले पाईप बदलण्यात आले होते. यावर लाखो रूपयांचा खर्च करण्यात आला. मंगळवारी रात्री पुन्हा कोंढे बौध्दवाडी परिसरात पाईप फुटल्याने आरजीपीपीएलकडे जाणारा पाणी पुरवठा बंद झाला आहे. सुमारे 30 वर्ष जूनी ही पाईपलाईन आहे. दरवर्षी शिरळ पंपहाऊस व या पाईपलाईनच्या देखभाल दुरूस्तीवर लाखो रूपयांचा खर्च केला जातो. पोफळीतील महाजनको कंपनी व्यवस्थापनामार्फत त्याचे नियोजन केले जाते. बहुतांशी ठिकाणी छोटे-छोटे पाईप टाकण्यात आले आहेत. पाण्याचा वेग अधिक असल्याने जुन्या पाईपमुळे ते फुटण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 5 ते 6 वर्षात असे प्रकार वारंवार घडत आहेत.
रस्त्यालगत व वस्तीच्या परिसरात ही पाईपलाईन आहे. अचानक कुठेही हे पाईप फुटत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही पाईप लाईन ग्रामस्थांसाठी आता धोक्याची घंटा ठरू लागली आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी मिरजोळी येथील दलवाई हायस्कूल परिसरात पाईप फुटून एका गाडीचे नुकसान झाले होते. पाण्याच्या फोर्सने उडालेल्या मोठय़ा दगडी त्या गाडीवर पडल्या होत्या. मात्र तो विषय परस्पर मिटवण्यात आला होता. काही वर्षांपूर्वी कोंढे परिसरात फुटलेल्या पाईपमुळे घरांचे व शेतीचे नुकसान झाले होते. अशा घटना वारंवार घडत असल्याने ती पाईपलाईन तत्काळ हटवण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
.