रहदारी पोलिसांकडून विद्यार्थ्यांची वाहने लक्ष्य
प्रतिनिधी / बेळगाव
आरपीडी ते गोमटेशपर्यंतच्या रस्त्यावर नो पार्किंगचा फलक लावला आहे. त्यानंतर आता त्या परिसरातील दुचाकी रहदारी पोलीस उचलून नेत आहेत. मात्र, यामुळे विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना फटका बसू लागला आहे. एक तर या परिसरात दुसरीकडे पार्किंगची सोय नाही. त्यातच अशा प्रकारे फलक लावून विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत आहे. यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
बऱयाच वेळा विद्यार्थी घाईगडबडीत रस्त्यावरच पार्किंग करून महाविद्यालयात जात आहेत. आरपीडी क्रॉस ते गोमटेशपर्यंत महाविद्यालयांचा परिसर म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी अनेक विद्यार्थी दुचाकी घेऊन येत असतात. बऱयाच वेळा महाविद्यालय कॅम्पसमध्ये वाहनांना परवानगी दिली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावरच पार्किंग करून जावे लागत आहे.
पोलीस दाखल होऊन दुचाकी उचलून नेत आहेत. मात्र, यामुळे मुलांच्या पालकांना मोठा फटका बसू लागला आहे. अव्वाच्या सव्वा दंड भरणे सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडत नाही. तेव्हा रहदारी पोलिसांनी प्रथम पार्किंगची सोय करावी, त्यानंतरच ही कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकवर्गातून होत आहे.