भारती विद्यापीठाचा ५७ वा वर्धापनदिन समारंभ साजरा
प्रतिनिधी / पुणे
आरोग्य आणि शिक्षण हेच जीवनाचे महत्वाचे पैलू आहेत असे मत राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. भारती विद्यापीठाचा ५७ वा वर्धापनदिन समारंभ करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, यावेळी उपस्थित होते.
राजेश टोपे म्हणाले, डॉ. पतंगराव कदम यांनी शुन्यातून विश्व निर्माण केले. त्यांच्यामुळे ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार झाला. ज्ञान, कौशल्य, गुणवत्ता, संशोधन आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षणाची गरज आहे. शिक्षण केंद्रे ही संस्कार केंद्रे व्हावीत. कोरोना संकटातील भारती हॉस्पिटलचे कार्य उल्लेखनीय आहे.
डॉ. विश्वजीत कदम म्हणाले भारती विद्यापीठाने सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या या संकटात विम्याचे सुरक्षा कवच दिले. भारती विद्यापीठ स्थापनेपासूनच डॉ. पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कायम ध्येयवादाने कार्यरत राहिलेले आहे. प्रा मिलिंद जोशी यांनी संचलन केले.