दोन्ही देशांकडून हवाई तसेच रणगाडय़ाद्वारे हल्ले : 100 हून अधिक जखमी, तुर्कस्तानची उडी
वृत्तसंस्था/ येरेवान
आर्मेनिया आणि अजरबैजान यांच्यात वादग्रस्त भूभाग नागोर्नो-कारबाखवरून पुन्हा एकदा युद्ध पेटले आहे. या युद्धात आतापर्यंत दोन्ही देशांच्या 23 जणांना जीव गमवावा लागला आहे. युद्धात मृत्युमुखी पडणारे बहुतांश जण हे सामान्य नागरिक असल्याचे सांगण्यात येत आहे. युद्धामुळे आतापर्यत 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
याचदरम्यान तुर्कस्तानने युद्धात अजरबैजानला साथ देण्याची घोषणा केली आहे. मी आणि तुर्कस्तानचे सर्व नागरिक अजरबैजानसोबत उभे आहोत. अजरबैजानवर हल्ला करून आर्मेनियाने पुन्हा एकदा तो देश जगाच्या शांततेसाठी धोकादायक असल्याचे सिद्ध केले आहे. स्वतःच्या भविष्यासाठी सरकारला विरोध करा असे आर्मेनियाच्या नागरिकांना सांगू इच्छितो. आर्मेनियाचे सरकार नागरिकांना काडीचीही किंमत देत नसल्याचा दावा तुर्कस्तानचे अध्यक्ष रजब तैयब एर्दोगान यांनी ट्विटद्वारे केला आहे.
रशियाकडून शांततेचे आवाहन
रशियाने आर्मेनिया आणि अजरबैजान यांना शांततेचे आवाहन केले आहे. मध्यस्थीसाठी तयार असलो तरीही याकरता दोन्ही देशांना त्वरित युद्ध थांबवावे लागेल असे रशियाच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. रशियाचे विदेश मंत्री सर्गेई लावरोव युद्धविरामासाठी दोन्ही देशांशी चर्चा करत असल्याची माहिती विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जखारोवा यांनी दिली आहे.
3 रणगाडे, 2 हेलिकॉप्टर्स नष्ट
अजरबैजानचे 3 रणगाडे आणि दोन हेलिकॉप्टर्स नष्ट केल्याचा दावा आर्मेनियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. तर अजरबैजानच्या संरक्षण मंत्रालयाने हा दावा फेटाळून लावला आहे.
युद्धाचे कारण
पूर्व सोव्हियत संघाच्या या दोन्ही देशांदरम्यान नागेर्नो-कारबाख भागावरून दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर हा भूभाग अजरबैजानचा हिस्सा मानला जातो, तर आर्मेनियानेही यावर दावा केला आहे. 1994 च्या लढाईनंतर हा भूभाग अजरबैजानच्या नियंत्रणात राहिलेला नाही. या भागात दोन्ही देशांचे सैनिक तैनात आहेत. सुमारे 4,440 किलोमीटरमध्ये फैलावलेल्या नागोर्नो-कारबाखचा बहुतांश हिस्सा डोंगराळ आहे. मागील वर्षी जुलै महिन्यातही दोन्ही देशांदरम्यान यावरून संघर्ष झाला होता. या संघर्षात 16 जणांचा मृत्यू झाला होता.