ऑनलाईन टीम / मुंबई :
आर्यन खान प्रकरणात पंच असलेला व फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक झालेला किरण गोसावी याची भाजपच्या नेत्यासोबत पार्टनरशीप आहे. हिवाळी अधिवेशनात याप्रकरणातील स्फोटक माहिती उघड करणार आहे. ज्यामुळे भाजपच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असा इशारा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.
समीर वानखेडे यांनी मलिक यांच्या जावयाला अटक केली म्हणून ते वानखेडेंवर आणि एनसीबीवर सातत्याने आरोप करत असल्याचे भाजप नेते सांगतात. यावर बोलताना मलिक म्हणाले, सध्या मी कोणत्याही नेत्याच्या आरोपाला उत्तर देऊन प्रकरणावरुन लक्ष डायव्हर्ट करु इच्छित नाही. 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामध्ये आर्यन खान प्रकरणाशी मोठा गौप्यस्फोट करणार आहे. मुंबईतील क्रूझ पार्टीच्या आयोजकांपैकी एक असणाऱ्या काशीफ खानला अटक झाल्यानंतर सखोल चौकशीमध्ये अनेकांची नावे समोर येतील. क्रूझवरील ड्रग्ज पार्टीची आमंत्रणं त्यानं सोशल मीडियावरूनही पाठवली होती. मात्र, त्याला अटक करण्यात आली नाही, कारण तो समीर वानखेडे यांचा मित्र आहे. एनसीबीच्या इतर अधिकाऱ्यांनी अनेकदा त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्येक वेळी वानखेडे यांनी काशिफ खानला वाचवलं. त्याच्या अटकेनंतर अनेकांच्या चेहऱ्यावरील मुखवटा हटेल, असेही मलिक म्हणाले.