दोन वर्षाच्या दीर्घ काळानंतर पांडुरंगाच्या भेटीची आस लागलेल्या भक्तांचा उत्साह यावषी तरी पंढरपूरची वारी करता येणार या बातमीने द्विगुणित झाला आहे. लाखो वैष्णव भक्त प्रत्यक्ष पांडुरंगाच्या भेटीला जाण्याची तयारी करीत आहेत, जे जाऊ शकत नाहीत असे असंख्य भक्त त्यांची सेवा करण्यात मग्न आहेत. पुढील एक दीड महिना संपूर्ण वातावरण पंढरीच्या वारीने भारावलेले असेल यात शंका नाही. गेली अनेक वर्षे चालत आलेल्या या अलौकिक परंपरेत या वषीही जवळजवळ 330 मान्यताप्राप्त आणि इतर स्वतंत्रपणे निघणाऱया 200 दिंडय़ा पंढरपूरच्या दिशेने अनेक ठिकाणाहून निघतील. पंढरपूरला येईपर्यंत या वारीमध्ये 10 लाखाहून अधिक वैष्णव भक्त आनंदाने विठ्ठलभक्तीमध्ये सहभागी झालेले असतात. चैत्र, माघ, आषाढ आणि कार्तिक अशा वर्षातून चार वेळा पंढरीची वारी असते पण त्यातील सर्वात जास्त सहभाग हा आषाढ वारीमध्ये असतो. लाखो लोक दररोज एका गावातून दुसऱया गावात अनेक ठिकाणाहून जवळ जवळ 20/22 दिवसांचा पायी प्रवास करत आषाढी एकादशीच्या दिवशी पंढपूरला श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. अनेक स्थानिक संस्थांच्या, मान्यवर व्यक्तींच्या, प्रशासकीय यंत्रणेच्या व इतर अनेक व्यक्तींच्या सहभागातून सर्व व्यवस्था वारकऱयांच्या सोयीसाठी करण्याचा प्रयत्न होत असतो. पण कितीही व्यवस्था केली तरी हा 20/22 दिवसांचा प्रवास ही एक तपस्या असते. काही वर्षांपूर्वी या वारीमध्ये वयाच्या 8 व्या वर्षांपासून अखंडित सहभागी होत असलेल्या एका 90 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीशी आमची भेट झाली. त्यांनी 82 वर्षे या वारीमध्ये दरवषी देहू ते पंढरपूर जवळजवळ 250 कि. मी. चे अंतर पायी प्रवास करत या वारीमध्ये सहभाग घेतला होता. एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की ‘आपण या वारीमध्ये कोणत्याही सुखसोयी, व्यवस्था नसताना गेली इतकी वर्षे कोणत्या प्रेरणेने सहभागी होता?’ यावर त्या हरिभक्ताने दिलेल्या उत्तरात पंढरीच्या वारीचा आशय दडलेला आहे. त्याच्या डोळय़ामध्ये आनंदाश्रू आले आणि तो म्हणाला ‘संसारामध्ये सर्व सोयी आहेत पण सुख नाही, पंढरीच्या वारीमध्ये सोयी नसतील, व्यवस्था नसतील पण अलौकिक सुख, आनंद निश्चितच आहे.’ किती गहन अर्थ आहे या उत्तरामध्ये! पंढरीचा ध्यास लागलेल्या अशा हरिभक्तांचा भाव समजल्याशिवाय पंढरीची वारी आपल्याला समजणार नाही.
असा कोणता अलौकिक आनंद, सुख पंढरीच्या वारीमध्ये, विठ्ठलाच्या भक्तीमध्ये आहे? या जगामध्ये सामान्य व्यक्ती सुख हे नाशवान वस्तुमध्ये शोधते त्यामुळे ते मृगजळाप्रमाणे पुढे पुढे दिसते, मिळेल असे वाटते पण कधीच प्राप्त होत नाही. आपले शरीर, मन, बुद्धी, परिस्थितीही कायम बदलत असते अशा अवस्थेत वास्तविक सुख आपल्याला प्राप्त होणे हे कधीच शक्मय नाही. यास्तव आपल्याजवळ जी वस्तू आहे तीच आपल्याला सुख देते असे वाटते. पण ज्याला या शरीरापलीकडे जाऊन आपण आत्मा आहोत, भगवंताचे अंश आहोत, भगवंतावर प्रेम करणे, त्यांची सेवा करणे हा आपला नित्य स्वभाव आहे याचा साक्षात्कार होतो त्यालाच केवळ या दिव्य आनंदाचा अनुभव येतो. आपण सद्यस्थितीत आपल्या शरीरावर, शरीराशी संबंधित व्यक्तीवर अथवा वस्तूवर प्रेम करतो, त्यांची सेवा करतो पण या सर्व गोष्टी अनित्य आहेत म्हणून येथे शाश्वत सुख नाही, याचे ज्ञान आणि अनुभव हरिभक्ताना येतो म्हणून असे ज्ञानी, साक्षात्कारी भाग्यवान जीव भगवंताच्या सेवेत समर्पित होतात. अशा हरिभक्तांचा सत्संग करण्यासाठी पंढरीची वारी हा एक दिव्य उत्सव असतो.
पंढरीच्या वारीमध्ये सहभागी होणारे वैष्णव आपले सामाजिक जीवनामधील कोणतेही स्थान असले तरी आपण केवळ एक हरिचा दास आहोत या भावनेने सहभागी होतात. कारण तुकाराम महाराजांसारखे महान वैष्णव सांगतात की अशा दास अथवा सेवक भावना ज्याच्या हृदयामध्ये जागृत होतात तेथे प्रत्यक्ष पांडुरंग अवतरित होतात. पंढरीच्या वारीतील स्वतःचा अनुभव सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात,
दास झालो हरिदासांचा । बुद्धी काया मन वाचा।।1।। तेथे प्रेमाचा सुकाळ । टाळ मृदंग कल्लोळ।।2।। नासे दुष्ट बुद्धी सकळ । समाधी हरिकीर्तनि ।।3।। ऐकता हरिकथा । भक्ती लागे त्या अभक्ता ।।4।। देखोनि कीर्तनाचा रंग । कैसा उभा पांडुरंग ।। 5।। हे सुख ब्रह्मादिकां । नाही नाही म्हणे तुका ।।6।।
अर्थात ‘मी काया, वाचा, मन आणि बुद्धीने हरिभक्तांचा दास झालो आहे, कारण त्यांच्याकडे हरिप्रेमाचा सुकाळ असतो त्यांच्या हरिकीर्तनामध्ये टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाच्या लाटा उसळत असतात, त्यांच्या सहवासात दुष्ट बुद्धीचा नाश होतो. त्यांच्याकडून हरिकथा, हरिकीर्तन श्रवण केल्याने अभक्तालादेखील भक्तीची गोडी लागते. त्यांच्या कीर्तनाचा प्रेमानंद पाहून प्रत्यक्ष पांडुरंगही कसा आवडीने तेथे उभा आहे पहा. अशा प्रकारचे सुख ब्रह्मादिक देवतांनाही प्राप्त होत नाही.’
या अभंगात आपली मूळ भावना हरिभक्तांच्या संगतीमध्ये कशी जागृत होते याचे वर्णन आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे ‘जसा संग तसा रंग’ याप्रमाणे ज्या व्यक्तीचा आपण संग करतो तसा आपला स्वभाव बनतो. मनुष्य जीवनाचे महत्त्व ज्याला माहिती आहे तो अशा हरिभक्तांच्या संगतीतील एकही क्षण वाया जाऊ देणार नाही कारण अशाच हरिभक्ती परायण वैष्णवांच्या संगतीमध्ये दिव्य श्रीकृष्णप्रेमाची प्राप्ती होते. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात (भ गी 10.9) मच्चि?त्ता मद्ग?तप्राणा बोधयन्तः परस्परम् । कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च अर्थात ‘माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करते, त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो’. भगवद्भक्ती हा जीवाचा नित्य स्वभाव असला तरी या भौतिक जगाचा प्रभाव आपल्या भावनेवर अज्ञानाने आणि अजाणतेपणाने पडत असतो. त्यामुळे आपली मूळ कृष्णभावना झाकली जाते, पण ज्यावेळी आपण हरिभक्तांच्या सहवासात राहतो तेव्हा या भावनेवर फुंकर घातल्याप्रमाणे पुन्हा आपल्याला त्याचा अनुभव यावयास लागतो. हरिभक्ती ही प्रत्येकाच्या हृदयात सुप्तावस्थेत असते. जसे जमिनीमध्ये पेरलेले बीज मातीने झाकल्यामुळे आपल्याला दिसत नाही, मात्र जेव्हा आपण त्यावर पाणी घालतो तेव्हा कालांतराने ते बीज अंकुरित होऊन जमिनीबाहेर वृक्षवेलीच्या स्वरूपात प्रगटित होते. आपल्या हृदयातील हरिभक्तीचे बीजही तसेच आहे. हरिभक्तीचा उदय आणि विकास होण्यासाठी हरिभक्तांचा संग यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
या जगामध्ये प्रत्येकजण प्रेमाचा भुकेला आहे, पण असे निस्वार्थी प्रेम कुठे प्राप्त करावे याची सर्वसामान्य लोकांना कल्पना नसते. त्यामुळे कामवासनेलाच लोक दुर्दैवाने प्रेम समजतात. प्रेम हे केवळ भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या निस्सीम भक्तांच्या सहवासातच प्राप्त होते. हरिभक्तांच्या सहवासात आपली सुबुद्धी जागृत होते आणि कुबुद्धी नष्ट होते. याप्रमाणे संपूर्ण हृदय आणि मन शुद्ध झाल्यावर आपली भावनाही शुद्ध होते आणि ज्या आनंदाच्या शोधात आपण आहोत त्याची प्रत्यक्ष अनुभूती येते. अशी ही पंढरपूरची वारी या वषी 20 जूनपासून सुरू होत आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी 11 जुलैला पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी येत आहे. चला तर मग, पंढरीच्या वारीला जाण्याची तयारी करुया आणि वारीमध्ये सहभागी झालेल्या हरिभक्तांबरोबर पांडुरंगाच्या भक्तीमध्ये मन अर्पण करुया.
-वृंदावनदास