ऑनलाईन टीम / सातारा :
कार्तिकी यात्रेनिमित्त खालापूर येथून आळंदीच्या दिशेने पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप घुसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर 30 वारकरी जखमी झाले आहेत. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वडगाव मावळ जवळील साते गावच्या हद्दीत हा अपघात झाला.
कार्तिक महिना असल्याने वारकऱ्यांची पावलं आळंदी, पंढरीच्या दिशेनं पडत आहेत. अनेक ठिकाणांहून दिंडय़ा जात आहेत. अशीच खालापूर उंबरी गाव येथून छोटय़ा ट्रक्टरला जोडलेल्या पालखीसह जवळपास 150 वारकऱ्यांची एक पायी दिंडी आळंदीकडे निघाली होती. या दिंडीत सकाळी सातच्या सुमारास भरधाव वेगातील पिकअप घुसला. या अपघातात दोन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर 30 जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतले आहे. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.