पंढरपूर / प्रतिनिधी
पंढरी नगरीमध्ये आषाढी एकादशी पासून सुरु होणाऱ्या चातुर्मासासाठी महाराज मंडळी वास्तव्यास असतात. यामध्ये येथील ह.भ.प.कुकुरमुंडे महाराज पंढरपुरात नुकतेच वास्तव्यास आले होते. सदरचे वृत्त समजताच पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर आणि उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांनी त्यांना भेटून नम्रपणे परत जाण्याची विनंती केली. आणि त्यांची पंढरपुरातून पाठवणी केली.
कोरोनामुक्तीच्या उपाययोजनासाठी आणि आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील सर्व मठधारकांना दोन महिने मठ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. यामध्ये नंदुरबार येथून ह.भ.प. नंदकुमार महराज कुकरमुंडे येथील प्रदक्षणा मार्गावरील आपल्या मठामध्ये रविवारी वास्तव्यास आले. सदरचे वृत्त हे पालिकेच्या अधिकाऱ्यांना समजले. त्यानंतर पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर आणि मुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांनी थेट कुकुरमुंडे महाराज यांचा मठ गाठला. आणि कायद्याने दिलेल्या नोटीसमुळे आपणास पंढरपुरात राहता येणार नाही. अन्यथा आपणावर कायदेशीर कारवाई करावी लागेल. असे समजावून सांगितले. आणि त्यांना परत पंढरपूर शहराबाहेर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नेऊन सोडले. विशेष म्हणजे शहराबाहेर ह.भ.प. नंदकुमार कुकुरमुंडे महाराज यांना आदरपूर्वक पुष्पहार अर्पण करून त्यांची पाठवणी करण्यात आली. या घटनेला अनेकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांची गांधीगिरी समजली. तर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मतानुसार आम्ही वारकरी महाराज मंडळींचा केलेला तो आदर आहे. असे सांगण्यात आले.
या घटनेनंतर ह.भ.प.नंदकुमार कुकरमुंडे महाराज हे आपल्या नंदुरबार या मूळ गावी परत निघून गेले. याप्रसंगी शहराबाहेर कुकूरमुंडे महाराज यांनीदेखील प्रशासन योग्य काम करीत आहे. याबद्दल कौतुक केले. तर शासनाकडून आवश्यक ती परवानगी मिळाली तरच आपण आषाढी यात्रेस पंढरपुरात वास्तव्यास येऊ. असेही यावेळी त्यांनी सांगितले.