वार्ताहर/ म्हापसा
गेले दीड महिने हणजूण, कायसूव तसेच आसगाव भागात अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त होऊन काल या नागरिकांनी म्हापशातील पाणी विभागावर घागर मोर्चा काढला. पण अभियंत्यांची भेट न झाल्याने या ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. महिलांनी कार्यालयावरील रस्त्यावर बसल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करून मोर्चेकरांना रस्त्याच्या बाजूला काढले.
गेली दोन वर्षापासून आसगावमधील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आजही या लोकांना मुलभूत सुविधांसाठी वणवण भटकंती करावी लागते. पाणी जीवनावश्यक असूनसुद्धा मूळ समस्या आजही आहे. हा प्रकार मानवी हक्काचे उल्लंघन असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या ऐश्वर्या साळगावकर यांनी केला. याविषयी वेळोवेळी कार्यालयाला तसेच अधिकाऱयांना माहिती देऊनही प्रतिसाद भेटत नाही. आमचा जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करावा. त्यामुळे लोकांचे पाण्यासाठी हाल होणार नाही. असे स्थानिक सदस्य विष्णू तळकटकर यांनी सांगितले.
सकाळपासून आम्ही कार्यालयासमोर होतो पण आमची गाऱहाणी ऐकण्यासाठी कोणीच अधिकारी उपलब्ध नव्हता. आठवडय़ातून एकदा लोकांना पाण्यासाठी कार्यालयावर धडक द्यावी लागते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करून गावातील पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी पंच सदस्य शितल दाभोळकर यांनी केली. पुढील 15 दिवसात गावातील पाणी पुरवठा समस्या सुरळीत न झाल्यास ग्रामस्थ कार्यालयाबाहेर रस्ता रोको करून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा उपसरपंच केशव पालयेकर यांनी दिला. मागील सात महिन्यापासून सुरळीत पाणी येत नाही. सर्वसामान्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. पण हॉटेल व अन्य व्यवसायिकांना सुरळीत पाणी मिळते अशी टीका अरुणा पालयेकर यांनी केली.