ऑनलाईन टीम / गुवाहाटी :
मुसळधार पावसामुळे दक्षिण आसाममधील बराक घाटी परिसरात भूस्खलनाच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये 20 जणांचा मृत्यू झाला आहे.
मान्सूनने आगमनावेळी पूर्वोत्तर भारताला मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे आसामच्या विविध भागात भूस्खलनाच्या घटना घडल्या. दक्षिण आसामधील डोंगराळ भागात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे झालेल्या भूस्खलनात कछार जिल्ह्यातील सात, हेलाकांडी जिल्ह्यातील सात आणि करीमगंज जिल्ह्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
प्रशासनाने घटनास्थळी बचाव पथके पाठवली आहेत. या भागात पावसामुळे दरवर्षी भूस्खलन होते. दरम्यान, मागील काही दिवसांपासून आसाममध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने तेथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. आसामच्या 21 जिल्ह्यातील 10 लाख लोकांना या पुराचा फटका बसला आहे. पूरपरिस्थितीत बर्याच भागाशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे या भागातील लोक कोणत्या परिस्थितीला सामोरे जात आहेत, हे जाणून घेणे कठीण आहे. अशा परिस्थितीत पावसामुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे.