प्रतिनिधी / बेळगाव
’आहार, विहार व विचार हे आपल्या आरोग्याचे तीन स्तंभ आहेत. कोणत्याही रोगाला प्रतिकार करण्यासाठी किंवा रोग होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याकरिता या तीन गोष्टी लक्षात घेऊन कार्य केले तर कोरोनाच काय कोणत्याही रोगाला रोखता येते’ असे विचार माधवबाग संस्थेचे कर्नाटक राज्याचे प्रमुख डॉ. प्रसाद देशपांडे यांनी बोलताना व्यक्त केले.
येथील प्रख्यात समर्थ अर्बन को-ऑप. सोसायटीच्यावतीने रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने गुरुवारपासून विविध कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. त्यातील पहिलाच कार्यक्रम होता तो समर्थ व्याख्यानमालेचा. या व्याख्यानमालेचे उद्घाटन गुरुवारी दुपारी समर्थ सोसायटीच्या मुख्य कार्यालयात डॉ. देशपांडे यांनी दीपप्रज्वलित करून केले. त्याप्रसंगी ‘कोविडनंतरची जीवनशैली’ या विषयावर डॉ. देशपांडे यांनी दीड तासाहून अधिक वेळ उद्बोधक मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते.
समर्थचे चेअरमन नरहरी जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत करून संस्थेच्या उपक्रमांचा आढावा घेतला. संचालक ऍड. अजय सुनाळकर यांनी डॉ. देशपांडे यांचा सन्मान केला. व्हाईस चेअरमन सुहास कुलकर्णी यांनी डॉ. सुमलता यांचा सन्मान केला. छाया जोशी यांनी स्नेहा यांचा तर सुनंदा आळतेकर यांनी सीमा यांचा सन्मान केला. गणपतराव कुलकर्णी यांनी जीवन खटाव यांचा सन्मान केला. प्रदीप कुलकर्णी व विनय कुलकर्णी या संचालकांनी डॉ. देशपांडे यांचा ’बहुआयामी व्यक्तिमत्त्व’ असा परिचय करून दिला. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल माधवबागतर्फे डॉ. देशपांडे यांनी नरहरी जोशी यांचा सन्मान केला. कोविडमुळे समारंभाचे प्रक्षेपण वेबिनारद्वारे करण्यात आले, ज्याचा हजारो लोकांनी झूम ऍप व युटय़ुबवर लाभ घेतला. आपल्या उद्बोधक व्याख्यानात डॉ. देशपांडे म्हणाले की, कोरोना अथवा कोणत्याही रोगाला दूर ठेवायचे असेल तर त्याबद्दलची पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. सध्या सरकार व काही संस्थांनी फारच चांगले कार्य चालू ठेवले आहे. आपण सर्वांनी मिळून कोणाला हरवायचे आहे. कोविडमधून बरे होऊन बाहेर आलेल्या लोकांनी अंगदुखी, घशाचा त्रास, ताप, वेगळय़ा प्रकारचा खोकला, श्वास घेण्यास होणारा त्रास किंवा सकाळी उठल्यावर येणाऱया शिंका असतील तर ही कोविडची लक्षणे आहेत हे लक्षात घेऊन त्याला घाबरून न जाता टक्कर दिली पाहिजे. रोगाची गंभिरता समजावून घेऊन रोगमुक्त होण्यासाठी घरोघरी औषधे घ्यावीत किंवा इस्पितळात दाखल होऊन उपचार करून घ्यावेत. पण रोग होऊच नये यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय योजले पाहिजेत. कोरोनानंतरही छातीत दुखत असेल, केस गळत असतील, डोके जड होत असेल, अंग दुखत असेल, थकवा येत असेल, भूक कमी होत असेल, आवाज बदलला असेल, चव कळत नसेल किंवा वासाची संवेदना कळत नसेल तर ही सर्व कोरोनाची लक्षणे आहेत हे लक्षात घेऊन आपण 5 सुवर्ण दक्षता घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
पचनशक्ती वाढवून, शरीरामध्ये अँटी इन्फ्लामेट्री सिस्टीम डेव्हलप करून शरीरातील मळ काढून निरोगी होता येते. त्यासाठी आयुर्वेदात सांगितलेली पंचकर्मा पद्धत अतिशय महत्त्वाची आहे. पचनाला सोपा असलेला उत्तम आहार ज्यामध्ये सॅलड, हिरवा भाजीपाला असावा, रात्रीचे जेवण हलके असावे, चपाती खाण्याऐवजी ज्वारी, बाजरी व रागी यांची पिठे मिश्रण करून भाकरी करावी. नेहमी चालणे, पोहणे, सायकलिंगसारखे व्यायाम, योगासने, प्राणायाम करण्याबरोबरच लवकर झोपून व्यवस्थित झोप झाल्यानंतर लवकर उठणे. किमान दहा मिनिटे मेडिटेशन करणे अशा गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. माधवबाग यांनी काही विशिष्ट पद्धती डेव्हलप केल्या आहेत. त्या पद्धतींच्या साहाय्याने आपण रोगाला थोपवू शकता, असेही डॉ. देशपांडे यांनी सांगितले.
व्हाईस चेअरमन सुहास कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री बागलकोटकर यांनी केले. ईशस्तवन सुमन यांनी सादर केले. दरम्यान, सकाळी गुरुकृपा कॉम्प्लेक्सस्थित दत्त मंदिरात ब्रम्हवृंदाद्वारे लघुरुद्र करण्यात आला.