भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेचे प्रतिपादन
चेन्नई / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा मालिकाविजय आता आमच्यासाठी इतिहासजमा झालेला आहे. शिवाय, जागतिक स्पर्धेतील फायनलमधील स्थान निश्चित करणे, हाही आमचा अजिबात प्राधान्यक्रम नाही. आम्ही एका वेळी एकाच मालिकेवर लक्ष केंद्रित करतो आणि इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकणे, हेच आमचे सध्याचे मुख्य लक्ष्य आहे, असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने केले. भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर आभासी पत्रकार परिषदेत तो बोलत होता. उभय संघातील पहिली कसोटी शुक्रवार दि. 5 पासून येथील चेपॉक स्टेडियमवर खेळवली जाणार आहे.
यापूर्वी, ऑस्ट्रेलिया दौऱयात अजिंक्य रहाणे हंगामी नेतृत्व भूषवत असताना त्याने भारतीय संघाला जिगरबाज विजय मिळवून दिला. ब्रिस्बेनमधील कसोटी जिंकणे विशेष लक्षवेधी ठरले. या पार्श्वभूमीवर रहाणेचे कल्पक नेतृत्वगुण जणू उजळून निघाले. मात्र, आता नियमित कर्णधार विराट कोहली संघात परतला असल्याने आपली जबाबदारी हलकी झाली असल्याचे रहाणे म्हणतो.
इंग्लंडचा संघ अव्वल आहे. त्यामुळे, अल्पसंतुष्टतेला वाव नाही’, असेही अजिंक्यचे मत आहे. भारत-इंग्लंड यांच्या मालिकेनंतरच जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडचा प्रतिस्पर्धी कोण असेल, हे निश्चित होणार आहे. मात्र, आपले लक्ष त्यावर अजिबात नसेल, असे रहाणे सांगतो.
विराटच संघाचा नेता
‘विराट संघात परतल्याने माझी बरीचशी जबाबदारी हलकी झाली आहे. आता मी एक पाऊल मागे येईन आणि विराट ज्यावेळी सल्ला मागेल, त्यावेळी आपल्याला जे वाटते ते सांगेन. विराट हाच संघाचा नियमित कर्णधार आहे. कौटुंबिक जबाबदारीमुळे तो मायदेशी परतला होता. त्याच्या गैरहजेरीत मी नेतृत्व सांभाळले. मात्र, आता तो संघात दाखल झाला आहे आणि यामुळे मी फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करु शकेन’, याचा त्याने येथे उल्लेख केला.
‘ऑस्ट्रेलियाविरुद्ध संपादन केलेला मालिकाविजय आता इतिहासजमा झाला आहे. आपण वर्तमानात आहोत. इंग्लंडचा संघ लंकेत कसोटी मालिका जिंकून येथे आला आहे. आम्हाला अव्वल दर्जाचा खेळ साकारायचा आहे आणि आम्ही काहीही गृहित धरलेले नाही, हे मी स्पष्ट करु इच्छितो’, असे रहाणे एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला.
अजिंक्यची सावध प्रतिक्रिया
भारतीय क्रिकेट संघ जागतिक कसोटी स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी फेवरीट मानला जातो. पण, याबाबत अजिंक्यने सावध प्रतिक्रिया दिली. ‘जागतिक कसोटी मालिकेच्या फायनल लढतीला अद्याप पाच महिन्यांचा अवधी बाकी आहे. सध्या इंग्लंडविरुद्ध मालिकेवरच आमचे पूर्ण लक्ष केंद्रित असेल. न्यूझीलंडचा संघ उत्तम खेळला आणि म्हणूनच त्यांना अंतिम फेरीत दाखल होता आले. आम्ही तूर्तास, एका वेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत’, असे तो म्हणाला.
फिरकी गोलंदाजीला पोषक चेपॉकच्या खेळपट्टीवर भारतीय संघाची रणनीती काय असेल, हे मात्र त्याने स्पष्ट केले नाही. गुरुवारी होणाऱया सराव सत्रानंतर संघ निश्चित केला जाईल, असे त्याने उत्तर दिले. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलला कसोटी पदार्पणाची संधी दिली जाणार का, या प्रश्नावर तो बोलत होता.
इंग्लिश संघात ऑली पोपचा समावेश
चेन्नई ः यजमान भारताविरुद्ध बहुप्रतिक्षित कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर इंग्लिश संघात मध्यफळीतील फलंदाज ऑली पोपला संधी दिली गेली आहे. 23 वर्षीय पोपला मागील ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना खांद्याला दुखापत झाली आणि त्यानंतर त्याला त्यावर शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागली होती.
यापूर्वी श्रीलंका दौऱयात पोपचा इंग्लिश संघात समावेश नव्हता. पण, तरी त्याला संघासमवेत नेले गेले. तेथे पथकासमवेत असल्याने इंग्लिश संघाच्या साहायक पथकाने त्याच्या तंदुरुस्तीवर मेहनत घेतली. इंग्लिश संघाच्या वैद्यकीय पथकाने त्याच्या तंदुरुस्तीबद्दल समाधान व्यक्त केल्यानंतर त्याच्या समावेशाचा मार्ग खुला झाला. मागील दोन दिवस त्याने पूर्ण सत्रात सराव केला. भारताविरुद्ध कसोटीत अंतिम संघात त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता असून असे झाल्यास तो पाचव्या किंवा सहाव्या स्थानी फलंदाजीला उतरु शकतो. इंग्लंडचा संघ एमए चिदंबरम स्टेडियमवर गुरुवारी शेवटच्या सत्रात सराव करेल, असे ईसीबीने म्हटले आहे.