ऑनलाईन शिक्षणातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न : मंत्री एस. सुरेशकुमार यांची अधिकाऱयांशी चर्चा
प्रतिनिधी /बेंगळूर
ग्रामीण भागातील मुलांना ऑनलाईन शिक्षणावेळी मोबाईल नेटवर्कची समस्या उद्भवू नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आश्वासन इंटरनेट पुरवठेदार कंपन्यांनी राज्य सरकारला दिला आहे. यासंदर्भात माहिती-तंत्रज्ञान खात्याच्या अप्पर मुख्य सचिवांनी इंटरनेट पुरवठेदार कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली असून इंटरनेट पुरवठय़ातील समस्या दूर करण्याची सूचना केली आहे.
ऑनलाईन शिक्षणावेळी उद्भवणारी इंटरनेट नेटवर्कची समस्या दूर करण्यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी सोमवारी राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रवीकुमार यांच्याशी चर्चा केली. माहिती तंत्रज्ञान खात्याचे अप्पर मुख्य सचिव रमणरेड्डी यांनी मोबाईल इंटरनेट पुरवठेदारांशी चर्चा केली असून कंपन्यांनी सुरळीत इंटरनेट पुरवठा होईल याकडे लक्ष देण्यात येईल, अशी ग्वाही दिल्याची बाब पी. रवीकुमार यांनी शिक्षणमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
सध्या पावसाळा असल्याने ग्रामीण भागात विशेष करून मलनाड आणि घाटमाथ्यांवर वसलेल्या खेडय़ांमध्ये इंटरनेट नेटवर्क मिळत नसल्याने विद्यार्थी पर्यायी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहात आहेत. वीज पुरवठय़ातही व्यत्यय येत असल्याने दूरदर्शनच्या चंदन वाहिनीवर प्रसारित होणारे व्हिडीओ पाठ पाहणे शक्य होत नाही. या समस्या दूर करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणात अडथळे येणार नाहीत यासाठी खबरदारी घ्या, अशी सूचना शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना दिली.
कोरोना परिस्थितीमुळे शाळा सुरू करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने ऑनलाईन शिक्षण पद्धतीद्वारे 1 जुलैपासून 2021-22 हे शैक्षणिक वर्ष सुरू केले आहे. मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणपद्धती अनिवार्य असल्याने इंटरनेट सेवा सुरळीत आणि वेगवान असणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील मुले ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी जागृत राहणे आवश्यक असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
शिक्षणमंत्र्यांच्या या सूचनेची दखल घेत मुख्य सचिव पी. रवीकुमार यांनी ग्रामीण भागात मोबाईल इंटरनेट नेटवर्कची समस्या निर्माण होणार नाहीत, यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करू, असे आश्वासन दिले.
ग्रंथालयांमध्ये शिक्षणाची पर्यायी व्यवस्था
ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील ग्रंथालयांमध्ये मुलांना दूरदर्शनच्या चंदन वाहिनीवरील शैक्षणिक कार्यक्रम पाहण्यासाठी टीव्हीची व्यवस्था करण्यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी अधिकाऱयांशी चर्चा केली. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे सल्लागार प्रशांत प्रकाश आणि राज्य सरकारचे शैक्षणिक सल्लागार प्रा. दोरेस्वामी यांच्याशीही चर्चा केली. राज्यातील 5,766 ग्राम पंचायतींच्या ग्रंथालयांचा वापर करून तेथे डिवाईस बसवून टीव्ही किंवा ऑनलाईन शिक्षणासाठी पर्यायी व्यवस्था सुरू असल्याची माहिती त्यांनी अधिकाऱयांना दिली आहे.