वापर वाढलाय, सेवेची कमतरता, अनेक कारणांमुळे होतोय अडसर, अवलंबित्व वाढताना गैरसोयींचा भडीमार
प्रसाद सु. प्रभू / बेळगाव
2020 वर्षाच्या मध्यावधीचा म्हणजेच जुलै महिन्यातला आकडा पहा. संपूर्ण कर्नाटकात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या आहे 82.78 मिलीयन. त्यापैकी एका बेळगाव जिल्हय़ातील इंटरनेट युजर्स आहेत जवळजवळ 25 लाख. यापैकी प्रत्येकाच्याच कपाळावरील आठय़ांच्या प्रमाणात मागील दोन ते तीन महिन्यात प्रचंड वाढ झाली आहे. इंटरनेट हा पूर्वी केवळ मनोरंजनाचा विषय होता. मात्र कोरोनामुळे शिक्षण आणि कामाचे एक महत्वाचे अंग बनलाय. वापर वाढतोय पण त्यामानाने मिळणाऱया दर्जाच्या बाबतीत बोंब सुरू आहे. अर्थात इंटरनेटच्या पुअर जाळय़ात बेळगाव खोळंबू लागले आहे.
कोरोना आला, लॉकडाऊन झाले. मुंबई, पुणे, बेंगळूर, हैद्राबादच्या मोठय़ा कंपन्या बंद पडल्या. अनेकांची कामे गेली. शाळाही सुरू झाल्या नाहीत. 50 हून अधिक टक्के लोकांना घरातच कार्यालये थाटावी लागली. अभ्यासाचा वर्ग क्लासरुममधून डायनिंगरुमपर्यंत आला. यामुळे बेळगाव जिल्हय़ात इंटरनेटवरील अवलंबित्वही प्रमाणाबाहेर वाढले आहे. मोबाईल, संगणक, ब्रॉडबॅन्ड, डोंगलचा पसारा घेवून बसलेल्या व्यक्तींना इंटरनेटच्या बाबतीत येणाऱया अडचणींचा डोंगर सतावणारा ठरतोय. असंख्य गैरसोयींचा भडीमार सोसत आणि स्ट्रॉंग इंटरनेट कनेक्शनच्या प्रतीक्षेत वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन एज्युकेशनचा डोलारा हेलकावे घेवू लागला आहे.
शहर असो वा ग्रामीण समस्या एकच
पूर्वी शहर आणि ग्रामीण असा विचार केल्यास ग्रामीणच्या तुलनेत शहरात काही प्रमाणात चांगले चित्र दिसायचे. मात्र आता दोन्हीकडे प्रॉब्लेम सेम टू सेम अशी स्थिती आहे. शहरात खोदलेल्या रस्त्यांच्या गर्दीत फायबर ऑप्टीक्सचे जाळे तुटण्याचा धोका तर ग्रामीण भागात अतिपाऊस आणि पडणाऱया झाडांमुळे टॉवरची क्षमता कमकुवत होण्याचे संकट सतावू लागले आहे. इंटरनेट प्रोव्हाईडर कंपनी कोणतीही असो प्रत्येक घरात आम्हीच असे सांगतानाच पूर्ण क्षमतेने म्हणण्याचे धाडस सध्या होत नाही. मोबाईलच्या माध्यमातून घेतलेले इंटरनेट असो किंवा कामाच्या आणि शिक्षणाच्या निमित्ताने इंटरनेटची स्वतंत्र लाईन ओढलेली असो, समस्या कायम आहेत.
खेडोपाडी मोबाईलची रेंज पोहोचली आणि त्या सोबतच इंटरनेटही पोहोचले. मात्र सध्याच्या काळात सेवा पुरविण्याच्या बाबतीत येणाऱया अडचणी ग्रामीण भागात अधिक डोकेदुखीच्या ठरल्या आहेत. लॉकडाऊनमुळे सेवा पुरविणारे कामगार कमी झाले. याचा फटका मोबाईल आणि इंटरनेट सेवा देणाऱया कंपन्यांना मोठय़ा प्रमाणात बसू लागला आहे.
नेमका वापर किती?
शिक्षण आणि काम अशी वर्गवारी केल्यास प्रत्येकाला सध्या इंटरनेट किती लागते, याचे गणित वेगवेगळे आहे. वर्क फ्रॉम होम करणाऱया नोकरदारांना घर बसल्या काम करण्यासाठी दररोज दोन ते चार जीबी इंटरनेट लागते. यापेक्षाही जास्त इंटरनेटची गरज त्यांना लागू शकते. शिक्षणाच्या दृष्टिने विचार केल्यास प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेणाऱयांना मोबाईलचा प्रतिदिवसाला दोन जीबीचा डाटा पुरेसा आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱयांना दिवसाला किमान 3 जीबी, त्यात अभियांत्रिकी अभ्यासक्रम असेल तर प्रतिदिवसाला किमान 4 जीबी आणि एमबीए व इतर अभ्यासक्रम असतील तर कमीतकमी 4 जीबी डाटा लागत आहे. कामाच्या आणि वापराच्या क्षमतेवरुन कुणाला किती इंटरनेट याचे स्वरुप ठरते. त्यानुसार मंथली प्लॅन घेतला जातो. मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेट घेणाऱयांना रोजचा कोटा संपला की पुन्हा टॉपअप मारावे लागते. तर थेट इंटरनेट घेवून काम करणाऱयांना प्लॅन अनलीमीटेड असला तरी त्याचे स्वरुप गरजेप्रमाणे बदलून घ्यावे लागते.
व्याप वाढला सेवा कमी घराघरातून व्हिडीओ पाठविणारे शिक्षक, ते व्हिडीओ स्वीकारुन डाऊनलोड करुन अभ्यास करणारे विद्यार्थी, कॉन्फरन्स कॉलच्या धर्तीवर एकाचवेळी अनेकांना शिकवणी देणारे खासगी शिकवणी चालक आणि त्यांचे ग्राहक असलेले विद्यार्थी, कंपन्यांच्या ऍप, वेबसाईट आणि स्वतंत्र सॉप्टवेअरच्या माध्यमातून काम करणारे नोकरदार यांच्यामुळे इंटरनेटच्या जाळय़ावरील व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान या जाळय़ाला अनेक आव्हानांचा सामनाही करावा लागत आहे. हवामानातील बदल, विकास कामे, नेटवर्कमधील समस्या, टॉवर्सच्या समस्या ही यामागील प्रमुख कारणे आहेत. इंटरनेट पुरविणाऱया कंपन्यांच्या प्रतिनिधींना सध्या मनुष्यबळाची समस्या अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे.