103 व्या जयंतीदिनी मान्यवरांची श्रद्धांजली
प्रतिनिधी/ पणजी
माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी या अफाट दूरदृष्टी असलेल्या खऱयाखुऱया आयर्न लेडी होत्या, अशा शब्दात मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
स्व. गांधी यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवनात आयोजित कार्यक्रमात विविध वक्त्यांनी विचार मांडले व स्व. गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला. त्यावेळी वरिष्ठ काँग्रेस नेते प्रतापसिंग राणे, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, पक्षाचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, शंभू भाऊ बांदेकर, चंद्रकांत चोडणकर, सुधीर कांदोळकर, रुडाल्फ फर्नांडीस, एम के शेख, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अनेकदा इंदिराजींना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला हे आपले भाग्य आहे. त्यांना प्रियदर्शनी म्हणून ओळखत होते, त्या केवळ भारताच्या पंतप्रधान बनल्या नाहीत तर, आपल्या कार्यकर्तुत्वाद्वारे संपूर्ण जगात त्यांनी स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केली. पाकिस्तानच्या दादागिरीला चाप बसविण्यासाठी त्यांनी बांगलादेशाची निर्मिती केली. भारताचे सार्वभौमत्व टिकविण्यासाठी वावरलेल्या अशा या महान नेत्याच्या पुण्यस्मृतीला आपला सलाम, असे राणे पुढे म्हणाले.
दिगंबर कामत यांनी बोलताना इंदिराजींनी देशातील गरीबातील गरीब लोकांना केंद्रबिंदू मानून अनेक निर्णय घेतले. बँकांचे राष्ट्रीयीकरण करून त्यांनी सर्वसामान्य लोकांनाही कर्ज मिळविणे शक्य केले. अशा या प्रचंड दूरदृष्टी असलेल्या नेत्याची जागी आजपर्यंत कुणीच घेऊ शकलेले नाही. त्यांचे देशासाठीचे बलिदान सदैव लक्षात राहील, असे ते म्हणाले. काँग्रेसचा उत्कर्ष कुणीही अडवू शकत नाही. जे सोडून जातात त्यांची चिंता करायची नाही. मागे वळून पाहतात ते केव्हाच जिंकू शकत नाहीत, म्हणून आपण सदैव पुढे जात राहायचे, असेही कामत म्हणाले.
गरीबांप्रती प्रचंड कळवळा असलेल्या इंदिराजींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करून सामान्यातील सामान्य माणसाला सुद्धा कर्ज मिळण्याची व्यवस्था केली. विद्यमान सरकार बँकांचे खाजगीकरण करत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पाच-सहा मित्रांच्या फायद्यासाठी मोठमोठय़ा संस्थांचे खाजगीकरण चालविले आहे. भविष्यात एमपीटीचेही खाजगीकरण करून ती अदानीच्या खिशात जाणार आहे, असे चोडणकर म्हणाले. काँग्रेसने गरीबी हटाव केले, आता भाजप गरीबांनाच हटाव करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
श्री. बांदेकर, कांदोळकर, चोडणकर, रुडाल्फ, एम के शेख यांनीही विचार मांडले. विजय पै यांनी सुत्रसंचालन केले. स्व. गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.