मोडी लिपीत दस्तऐवज पालिका लवकरच मराठीत करणार
इचलकरंजी / संजय खूळ
इचलकरंजी संस्थानाचे अधिपती श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे यांनी 1893 मध्ये इचलकरंजी नगरपालिकेची स्थापना केली. तब्बल एकशे तीस वर्षांनंतर या नगरपालिकेचे रूपांतर आता महानगरपालिकेत करण्याबाबत जोरदार हालचाली सुरू आहेत. पालिकेच्या पहिल्या इतिवृत्तामध्ये कामकाज पद्धतीचा कसा ठराव झाला, याबाबतची माहिती प्राप्त झाली आहे. 1 एप्रिल 1893 ते 31 मार्च 1894 या कालावधीतील मोडी लिपीतील इतिवृत्त सापडले आहे. तब्बल सत्तावीस पानांच्या या मोडीलिपीच्या इतिवृत्ताचे आता भाषांतर करून घेण्यात येणार आहे.
इचलकरंजी संस्थानाचे शेवटचे अधिपती श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे हे 1892 मध्ये इचलकरंजी संस्थानाच्या गादीवर आले. त्यानंतर त्यांनी इचलकरंजी शहरासह संस्थानाच्या विकासासाठी अनेक धोरणे आखण्यास सुरुवात केली. इचलकरंजी गावचा कारभार त्यावेळी संस्थांनामधूनच चालत होता. हा कारभार स्वतंत्रपणे व्हावा यासाठी त्यांनी इचलकरंजी पालिका स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी 1893 मध्ये इचलकरंजी नगरपालिका स्थापन केली.
पालिकेची स्थापना केली असली, तरीही श्रीमंत बाबासाहेबांनी शहरातील नागरिकांच्या सुविधांसाठी अनेक खर्चाच्या बाजू आपणहून उचलल्या. नागरिकांना करण्यात येणारा पाणी पुरवठा नगरपालिकेस झेपण्याजोगा नव्हता. त्यामुळे त्याच्या खर्चाचा अर्धाअधिक भाग संस्थानाकडून उचलला जात असे. केवळ नगरपालिका हद्दीत नव्हे, तर संस्थानातील अनेक लहान-मोठय़ा गावांत रस्ते, पाण्याची सोय, शाळा इमारती, चावडी अशा सुविधा बाबासाहेबांनी करून दिल्या. पालिकेचे कामकाज हे स्वतंत्र इमारतीत चालावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी सुरुवातीस गावभागातील नरसोबा कट्टा लगतच्या एका इमारतीत नगरपालिकेचे काम सुरू केले. त्यावेळी शहराची लोकसंख्या जेमतेम पाच हजारांच्या आसपास होती. त्यानंतर पालिकेचे कामकाज सध्या मंगलधामच्या नारायण सभागृहात आणि त्यानंतर गोविंदराव हायस्कूलसमोर असलेल्या सध्याच्या सिटी सर्वे ऑफिसमध्ये कामकाज सुरू राहिले.
शहराची लोकसंख्या आज तीन लाखांवर गेली आहे. अनेक वर्षे इचलकरंजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर व्हावे यासाठी चर्चा सुरू आहे. पालिकेने महानगरपालिका करण्याबाबत ठोस पावले उचलली आहेत. मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी इचलकरंजी महापालिकेबाबत पाच अधिकाऱयांची समिती नियुक्त केली आहे. या समितीमार्फत महानगरपालिकेचा प्रस्ताव तयार करण्याचे काम गतीने सुरू आहे. पालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करताना मूळ पालिकेच्या स्थापने वेळचा ठराव काय झाला होता याबाबतची आता शहानिशा सुरू झाली आहे. याचा शोध घेतानाच 1893 मध्ये मोडी लिपीत असलेल्या इचलकरंजी पालिकेच्या इतिवृत्ताची कागदपत्रे सापडली आहेत. एकूण सत्तावीस पाने असून पालिकेच्या रेकॉर्ड विभागात हा दस्तऐवज अत्यंत सुरक्षितपणे होता.
उलगडणार कार्यपद्धती
संस्थान काळात पालिकेच्या कामाची पद्धत काय होती, कशा स्वरूपात इतिवृत्त लिहिले जात होते, कोणकोणत्या बाबीचा त्यामध्ये समावेश केला गेला, याबाबतची सर्व माहिती लवकरच उलघडणार आहे. 27 पानांच्या या दस्तऐवजाचे लवकरच मराठीत भाषांतर करून घेण्यात येणार आहे.