सडक’ नाटक म्हणजे माणसाकडून माणसाकडे जाण्याचा एक योग्य प्रयोग असून अशा नाटय़ प्रवासात आपण साऱयांनीच सहभागी होऊन अशा उपक्रमाला पाठबळ देणे म्हणजेच माणूसकीचे रिंगण नाटय़ परिपूर्ण करणे होय!
थेट माणसात जाऊन विनाअभिनिवेशी सुसंवादी कला सादर करणाऱया एतद्देशीय कलाप्रकारांची उन्नत परंपरा कायम राखणारा कलाप्रकार म्हणजे सडक नाटक. या नाटकाची परंपरा मोठी आहे आणि ती थेट माणसाच्या रोजच्या जगण्याशी जोडली गेली आहे. 1917 च्या रशियन क्रांतीनंतर लगेचच सादर झालेले मायकोवस्कीचे ‘मिस्ट्री बुफे’ हे त्या काळातलं तंबूत केलं जाणार नाटक. पुढे ज्यात क्रांतिकारी गाण्यांचा समावेश करून ते शहरातल्या चौकाचौकात सादर केल गेलं. आज या सगळय़ाची आठवण येण्याची कारणं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातही अशा सडक नाटकाची सशक्त परंपरा जोपासली जात असताना त्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलन इस्लामपूर शाखा म्हणजे याच सांस्कृतिक परंपरेतील चळवळीचं केंद्र मानलं जात आहे. त्याचं कारण म्हणजे 2001 पासून इस्लामपूर शाखेतील कार्यकर्ते कलावंत सडक नाटकांचे प्रयोग तसेच कार्यशाळा घेऊन नव्या पिढीला या माध्यमाची ओळख करून देतानाच या पिढीला डोळस बनविण्याचे काम करत आहेत.
इस्लामपूरचे योगेश कुदळे हे एक या चळवळीचे इतरांबरोबरचे आधारस्तंभ आहेत. ते आपल्या सडक नाटय़चळवळीविषयी म्हणतात, अंगणमंच या संकल्पनेचे जनक बादल सरकार यांच्याच मतांप्रमाणे आमच्या सडक नाटकाचा प्रेक्षक वर्ग हा सामान्य माणूस आहे. कारण जे तमाम शोषित, पीडित, अन्यायग्रस्त लोक आहेत, त्यांना अन्यायाविरोधात वाचा फोडण्यासाठी प्रवृत्त करणे हाच उद्देश आमच्या या नाटकाचा आहे. आम्ही इस्लामपूरमधील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखेने हेच उद्दिष्ट डोळय़ासमोर ठेवून सडक नाटक करायला सुरुवात केली. सुमारे 20 वर्षांपूर्वी इस्लामपूरच्या एका महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलनचे अधिवेशन होतं. त्या निमित्ताने भास्कर सदाकळे या कलावंताने ‘बुवाला भाळली, चांगलीच पोळली’ या छोटेखानी नाटकाचा प्रयोग रॅलीत रस्त्यावरती केला. काही कार्यकर्त्यांना याचं विलक्षण अप्रूप वाटलं. पुढे शहरातील स्वच्छता मोहिमेदरम्यान एकेदिवशी भल्या सकाळी इस्लामपुरात स्कूटरवरून एक दाढीवाला नवीन गृहस्थ आला. त्यांनी इस्लामपुरातील तरुणांना गांधी चौकात एकत्र केलं आणि ‘गावात आलं नवच वारं’ हे गाणं गायला सुरुवात केली. पहाडी आवाजाचा तो गृहस्थ म्हणजे भारत ज्ञान विज्ञान समुदायाचे कॉ. शंकर पाटील होते. ज्यांनी 85 साली सायकलवरून शिक्षणाच्या अनुषंगाने जत्था काढला होता. त्यात गावागावांमध्ये, शाळा-कॉलेजात सडक नाटकं केली होती. खरे तर इस्लामपूरच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या सडक नाटकाचा प्रारंभ इथूनच सुरू झाला. जगभरात या प्रकारची नाटकं राष्ट्राच्या उभारणीसाठी, लोकशाही टिकविण्यासाठी युद्धाच्या, आणीबाणीच्या प्रसंगी केली जात होती. पश्चिम महाराष्ट्रातीलही सडक नाटय़चळवळ आजच्या काळाचे संदर्भ, घटना घेऊनच आपले नाटक सादर करत आहे. हे नाटय़भान म्हणजे त्यांचे अमाप कौतुकच होय. महाराष्ट्रात कॉ. गोविंद पानसरे यांनी पुढाकार घेऊन कॉ. सफदर हश्मींच्या आठवण दिनानिमित्त सडक नाटकाच्या स्पर्धा आणि त्याचं सादरीकरण याचे आयोजन करण्याची सुरुवात साधारणपणे 2003 च्या आसपास केली. त्यानंतर इस्लामपूरमधील कलावंत कार्यकर्ते डॉ. नितीन शिंदे, संजय बनसोडे, डॉ. प्रमोद दुर्गा, नीलेश कुडाळकर, प्रशांत इंगळे, चंद्रकांत कोळी, अमोल चौगुले, शुभांगी शिरसे, माया जाधव, अवधूत कांबळे, कॉ. शंकर पाटील आणि योगेश कुदळे यांनी सफदरचा विचार पुढे नेत दरवषीच्या एक जानेवारीला सडक नाटकांचं सादरीकरण करत सफदर हाश्मी यांना अभिवादन करण्याच काम सुरू केले, जे आजतागायत सुरू आहे. खरं तर दिल्लीस्थित सफदर हाश्मी यांच्यानंतर महाराष्ट्रातल्या इस्लामपूरसारख्या शहरात आजही ही विचारांची ज्योत तेवत राहिलीय, ती फक्त विचारांचीच ताकद असल्यामुळेच. कारण माणूस मारून विचार संपत नाहीत. याच महाराष्ट्र अंनिसच्या इस्लामपूर शाखेने आजतागायत ‘एक प्रश्न’, ‘प्रॉडक्ट’, ‘आक्रीत घडलं,’ ‘अंगभर सोनं की सोन्यासारखी मुलगी,’ ‘चॅनेल हंगामा,’ ‘नदी विकली,’ ‘ऐ मेरे वतन के लोगो,’ ‘मेरा बचपन,’ ‘रेड लाईट,’ ‘आंधळं शतक,’ ‘ग्रामस्वच्छता,’ ‘जिऊ,’ ‘शिक्षणाची गाडी,’ ‘पोरं कुठं गेलीत सारी,’ ‘लेक वाचवा माणूस जगवा,’ ‘औरते’ आदी सडक नाटकांचे सबंध महाराष्ट्रभर प्रयोग करून वैचारिक सांस्कृतिक चळवळ जीवंत ठेवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे सुरू ठेवला आहे. यातील काही सडक नाटकांचे लेखन शफाअत खान, पवन खेबुडकर, डॉ. माया पंडित यासारख्या प्रथितयश लेखकांपासून ते संजय बनसोडे, योगेश कुदळे, डॉ. नितीन शिंदे या सारख्या कार्यकर्त्यांनी केले आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटित कार्याचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला. डॉ. दाभोलकरांच्या खुनाचा निषेध सांस्कृतिक माध्यमातून करण्यासाठी विचारशील ज्ये÷ रंगकर्मी अतुल पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली रिंगण नाटक संकल्पना जन्माला आली. त्यांनी राजू इनामदार यांच्या साथीने रिंगण नाटकाच्या कार्यशाळाही घेतल्या. खरं तर सडक आणि रिंगण नाटक या दोन्ही बाबी वेगळय़ा वाटत असल्या, तरी त्या दोघांची निर्मिती ही शोषितांचे प्रश्न मांडण्यासाठीच झालेली आहे. एका अर्थाने मरगळलेल्या परिवर्तनवादी सांस्कृतिक चळवळीला उर्जितावस्था देण्याचं काम महाराष्ट्र अंनिसच्या रिंगण नाटकाने केलं आहे. डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर इस्लामपूरच्या गटाने ‘सॉपेटीस ते दाभोलकर पानसरे व्हाया तुकाराम’ हे रिंगण नाटय़ फक्त महाराष्ट्रातच नाही, तर दिल्ली, कर्नाटक, भोपाळ, मध्यप्रदेश, गुजरात, गोवा इत्यादी राज्यांमध्ये तसेच अखिल भारतीय नाटय़संमेलन ते थेट ‘चला हवा येऊ द्या’ या टीव्ही मालिकेमध्ये त्याचबरोबर एनडी टीव्ही, साम टीव्हीवर सादर करत जवळ-जवळ त्याचे अडीचशेच्यावर प्रयोग केले. राजा शिरगुप्पी, प्रा. एकनाथ पाटील, संजय बनसोडे यांनी या रिंगण नाटकाचे लेखन केलं होतं आणि विजय पोवार, योगेश कुदळे यांनी त्याचे नाटकाचे दिग्दर्शन केले होते. तर संगीत विजय नांगरे आणि जगन्नाथ नांगरे यांनी दिले होते. हे सडक नाटक ते रिंगण नाटकाचा प्रवास जुन्या पिढीचा नव्या पिढीशी असणारा सांस्कृतिक मिलाप आहे. विजय नांगरे, जगन्नाथ नांगरे, अजय भालकर, अजय काळे, विनायक कांबळे, सागर सूर्यवंशी, अरुण भोसले, इंद्रायणी पाटील, सुनील जाधव यासारख्यांचा यात सहभाग आढळतो. या रिंगण नाटकाला काही मंडळींनी विरोधही केला. हे नाटक सादर करणाऱयांवर हल्ला करण्याचा प्रयत्नही झाला पण तरीही इस्लामपूरच्या नाटय़गटाने जीवाची पर्वा न करता रिंगण नाटकाचे प्रयोग सुरूच ठेवले आहेत. आता सडक नाटक, रिंगण नाटक आणि त्याचसोबत महाराष्ट्र अंनिसला तीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त इस्लामपूर शाखेने ‘महाराष्ट्र अंनिसचा विवेकी धांडोळा’ हा तब्बल दीड तासांचा कार्यक्रम सादर करायला सुरुवात केली आहे. हा कार्यक्रम म्हणजे गाणं, नाटक, नृत्य या साऱयांचा मिलाप आहे. 2001 साली सुरू झालेला हा इस्लामपूर शाखेचा असा प्रवास आज अखेरपर्यंत न थकता सुरू आहे. हा प्रवास म्हणजे माणसाकडून माणसाकडे जाण्याचा एक योग्य प्रयोग असून अशा प्रवासात आपण साऱयांनीच सहभागी होऊन अशा उपक्रमाला पाठबळ देणे म्हणजेच माणूसकीचे रिंगण नाटय़ परिपूर्ण करणे होय!
अजय कांडर